सातारा : प्रभागात भांडणे आणि हाणामाऱ्या सातत्याने होतात आणि विकासकामापेक्षा अधिक रस या भांडणांमध्ये घेतला जातो, असा आरोप नगरसेवक अमोल मोहिते यांच्यावर केला जातो. त्याला उत्तर देताना ते बिनधास्तपणे म्हणतात, ‘मारामाऱ्या तर होत राहणारच. भागात शांतता राखण्यासाठी शेवटी आम्हाला मिटवामिटवी करावी लागणारच. त्यामुळे विकासकामांबरोबरच अशा गोष्टींमध्येही कधीकधी रस घ्यावाच लागतो.’‘लोकमत टीम’च्या प्रभागदौऱ्यानंतर चार नगरसेवकांनीही ‘लोकमत’ कार्यालयात स्वच्छंद फटकेबाजी केली. प्रभागातील नागरिक समस्या मांडायला पुढे येत नसल्याबद्दल अशोक मोने, अमोल मोहिते, दिनाज शेख आणि सुजाता राजेमहाडिक यांना विचारण्यात आले, त्यावेळी सर्वांनी वेगवेगळी मते नोंदविली. परंतु नागरिक मतप्रदर्शन करीत असताना कार्यकर्त्यांनी तटस्थ राहावे, या अशोक मोने यांच्या मताशी सर्वांनीच सहमती दर्शविली. नेत्यांमुळेच जनतेत आपल्याला मान मिळाला असल्याचे दिनाज शेख यांनी सांगितले. प्रभागातील एका घटनेच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले. ‘जनसंपर्क आणि इतर बाबींमध्ये तुमचे पतीच अधिक सक्रिय असतात, असे लोकांचे म्हणणे आहे,’ हे निदर्शनास आणून दिले असता त्या म्हणाल्या, ‘ते अधिक अनुभवी आहेत. मी त्यांचे मार्गदर्शन घेते; मात्र स्वत:चा जनसंपर्क ठेवला आहे.’नगरपालिकेत तुमच्या नावाची दहशत आहे का, या प्रश्नाला ‘मी तर नगरपालिकेत फार जातही नाही. फोनवरूनच कामे करून घेते,’ असे सांगून बगल देण्याचा प्रयत्न सुजाता राजेमहाडिक यांनी केला. मात्र, ‘चांगल्या कामासाठी दहशत असली तर काय बिघडले,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली. अशोक मोने यांनी पालिकेतील आपली ही सहावी टर्म असल्याचे सांगत जनसंपर्क आणि केलेल्या कामांमुळेच आपण एकेकाळी विरोधकांच्या जोरदार लाटेतही निवडून आलो होतो, याची आठवण बोलताना करून दिली. यावेळी चार वर्षांत प्रभागात केलेल्या कामांची यादी नगरसेवकांनी सादर केली. सर्वांनीच आपापल्या भागातील बहुतांश प्रलंबित कामे पूर्ण केल्याचा दावा केला. काही किरकोळ कामे प्रलंबित असली, तरी त्यातील अनेक मंजूर असून, आगामी काळात ती पूर्ण होतील, असा विश्वास नगरसेवकांनी व्यक्त केला. (लोकमत चमू)
मारामाऱ्या होणारच; मिटवामिटवी चालणारच!
By admin | Updated: March 1, 2016 00:11 IST