वाई : महाबळेश्वर, पाचगणी, वाई येथे पर्यटकांच्या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, वाहतूक कोंडी टाळून वाहतूक सुरळीत होईल, असा प्रयत्न करावा, असे आवाहन प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी केले.
महाबळेश्वर, पाचगणी, वाई, खंडाळा येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाई येथे आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे-खराडे, तहसीलदार रणजित भोसले, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील, सहायक निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.
संगीता राजापूरकर-चौगुले म्हणाल्या, ‘कोविड प्रादुर्भावानंतर पर्यटन स्थळे खुली करण्यास परवानगी मिळाल्याने आगामी काळात महाबळेश्वर, पाचगणी, वाई या परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता असते. वाई-महाबळेश्वर रस्त्यावर पसरणी घाट, पाचगणी टोल नाका, पाचगणी बाजारपेठ, भोसे खिंड, वेण्णा लेक, महाबळेश्वर एसटी स्टँड, वाई शहरातील भीमनगर ते एसटी स्टॅन्ड परिसरात वाहनांच्या वाढत्या संख्येने वाहतूक कोंडी होत असते. कोंडी टाळण्यासाठी वाई, पाचगणी, महाबळेश्वर पोलिसांनी नियोजन करावे. शक्य तिथे एकेरी वाहतुकीचा अवलंब करावा. पाचगणी टोलनाक्यावर पालिकेने कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी. महाबळेश्वर-भोसे खिंड येथे रस्ते मोकळे रहावेत. वेण्णा लेक येथे बोटिंगच्या तिकिटासाठी रस्त्यापर्यंत येणाऱ्या रांगेचे नियोजन करावे. घोडेसवारीसाठी वेगवेगळ्या ठिकाणांचा अवलंब करावा. जेणेकरून तेथील गर्दी कमी होईल व रस्त्यावर वाहने वाढणार नाहीत.’
‘महाबळेश्वर येथील पालिकेच्या वाहनतळाला जाण्यासाठी व येण्यासाठी एकच मार्ग आहे. त्यामुळे गर्दी वाढून बाजारपेठेत वाहतूक कोंडी होते. तेथे जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार करावेत. महाबळेश्वर येथील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पालिकेने जास्तीचे गणवेशधारी कर्मचारी ओळखपत्रासह नेमावेत. वाईपासून महाबळेश्वरपर्यंत लावण्यात आलेले माहितीचे फलक व रस्त्याचे फलक वाहनधारकांना व पर्यटकांना दिसतील, असे लावावेत. महाबळेश्वर एसटी स्टँड परिसरात वाहने उभी करण्यास मनाई करून त्याऐवजी पालिकेने इतरत्र वाहनतळ उभारावा. या परिसरात कोणत्याही परिस्थितीत वाहतूक कोंडी होऊन रस्ता बंद होणार नाही, याची काळजी घ्यावी. नेहमी वाहतूक सुरळीत राहील, असा प्रयत्न करावा,’ अशी सूचना प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी केली.
पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांनी वाहतूक सुरळीत राहण्याचे, कोंडी टाळण्याचे नियोजन केले आहे.