मायणी : गेल्या चार दिवसांपासून निर्माण होत असलेले ढगाळ वातावरण व अधूनमधून येणाऱ्या अवकाळी पावसाच्या हलक्या सरी यामुळे द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली आहे. जर असेच वातावरण आणखी काही दिवस राहिल्यास द्राक्ष बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मायणीसह, कलेढोण, गारळेवाडी, विखळे, पाचवड, मुळकवाडी, कान्हरवाडी, हिवरवाडी, अनफळे, मोराळे, मराठानगर, निमसोड, आदी गावांच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला जोडव्यवसाय म्हणून द्राक्ष बागांची लागवड केली. लोकल बाजारपेठेबरोबर परदेशातील बाजारपेठेत द्राक्ष निर्यात करण्यासाठी लागणाऱ्या द्राक्षाचे उत्पादन घेण्यास या भागातील शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले.
परिसरामध्ये ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांतच द्राक्ष बाग छाटणी करून उत्पादन घेण्यास सुरुवात केली साधारण १२० ते १३० दिवसांमध्ये पूर्ण परिपक्व होऊन द्राक्ष बाजारपेठेत जात आहेत. आज यावर्षीच्या द्राक्ष हंगामातील शेवटचे काही दिवस शिल्लक असताना रविवार, सोमवारपासून या भागात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.
या ढगाळ वातावरणाबरोबरच अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. पावसाच्या हलक्या सरी येत असल्याने द्राक्ष फळावर धावण्या किंवा भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच पावसाचे मोठे थेंब पडले तर द्राक्षाचा मनी फुटण्याची व तुटण्याची शक्यता अधिक आहे. सतत होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे द्राक्षाचे पीक वाया जाण्याची शक्यता आहेच, शिवाय आणखी काही दिवस असेच वातावरण राहिले तर द्राक्ष पिकाला मोठा फटका बसून बागायतदार आर्थिक संकटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चौकट :
निर्यातीसाठी पूर्ण पक्व झालेल्या द्राक्षाला वातावरणाचा फारसा परिणाम होत नाही. मात्र, मोठा पाऊस झाला तर द्राक्षाचे मणी फुटण्याची शक्यता आहे व फुटलेल्या द्राक्षामध्ये पाणीसाठी, तर द्राक्ष कुजण्याची व नासण्याची शक्यता अधिक आहे.
कोट..
सध्या असलेल्या वातावरणाचा फारसा फरक द्राक्षावर जाणवणार नाही. त्यामुळे अधिक काळजी करण्याची गरज नाही. मात्र, असेच वातावरण अजून काही दिवस राहिल्यास मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
-दीपक यलमर, द्राक्ष बागायतदार, कान्हरवाडी
०७मायणी द्राक्ष...
मायणी परिसरातील द्राक्ष हंगाम ऐन बहरात असताना ढगाळ वातावरणामुळे चिंता वाढली आहे. (छाया : संदीप कुंभार)