खंडाळा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने खंडाळा तालुक्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायतींसाठी विविध पक्षीय पॅनेलअंतर्गत लढती होत आहेत. बहुतांशी ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध कुठे भाजपा, काँग्रेस व इतर विरोधी पक्षांचे पॅनेल दंड थोपटून उभे ठाकले आहेत. त्यामुळे तालुक्यातील गावपुढारी सत्तासंघर्षाच्या राजकारणात मग्न आहेत.
खंडाळा तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींसाठी बिगुल वाजला होता. त्यापैकी सात ग्रामपंचायतींसह १३१ जागा बिनविरोध झाल्याने ५० ग्रामपंचायतीत ३२० जागांसाठी लढती होत असून ६९८ उमेदवार मैदानात उतरले आहेत. तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने प्राबल्य राखले आहे. परंतु गत जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या. पुन्हा बळकटी दिली असली तरी या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीविरोधात विरोधी पक्षही सक्षम झाले आहेत. वास्तविक आमदार मकरंद पाटील यांच्या जनसंपर्कामुळे विधानसभेला विरोधी प्रभाव जाणवला नसला तरी, ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक गटबाजीमुळे ते दिसून येण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील भादे, अंदोरी, अहिरे, पारगाव, खेड बुद्रुक, पाडळी, विंग, बावडा, शिवाजीनगर, नायगाव, जवळे, शिंदेवाडी, कवठे, पिंपरे बुद्रुक या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीच्या लढती होण्याची चिन्हे आहेत. काही ग्रामपंचायतींमध्ये अंतर्गत मतभेदामुळे तिहेरी लढत होत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय घडामोडी झाल्या. स्थानिक काँग्रेसच्या मोठ्या गटाने भाजपाला साथ दिली. यांच्या ताकदीमुळे भाजपाला आणखी बळ मिळाले. हाच गट ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात सरसावला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विरोधात ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधक चांगलं बाळसं धरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीअंतर्गत गटांनी एकमेकांविरुध्द दंड थोपटल्याने तेथील लढतीकडे लक्ष लागले आहे.
तालुक्यात मध्यंतरी वंचित बहुजन आघाडीने उभारी घेतली होती. बहुतांशी गावात त्यांच्या शाखाही उघडल्या होत्या. पक्षांच्या स्थानिक आघाडीत वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांना संधी दिली. मात्र या आघाडीला स्वतंत्रपणे पॅनेल उभे करता आले नाही.
विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या राजकीय घडामोडीनंतर काँग्रेसचे नुकसान झाले होते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत पक्षाची असणारी पॅनेल काही गावे वगळता कोठेही दिसून येत नाहीत. त्यामुळे हा पक्ष पुन्हा उभारी घेणार का? याकडे लक्ष लागले आहेत. याउलट गावोगावी राष्ट्रवादीची बाजू आणखी मजबूत करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी धावपळ करत आहेत.
चौकट
बिनविरोधचा डंका
तालुक्यातील सात गावे बिनविरोध झाली असून यामध्ये पळशी, कराडवाडी, वाण्याचीवाडी, लिंबाचीवाडी, हरळी, कान्हवडी, घाडगेवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. बिनविरोध करून गावाची एकी राखली गेली. घाडगेवाडीने सलग तीस वर्षे बिनविरोध निवडणुकीचा डंका वाजविला. भादवडेने बिनविरोधचा प्रयत्न करूनही एका जागेची माघार झाली नसल्याने, तेथे लढत होत आहे. तसेच राजकीय संघर्षानंतर हरळी, कराडवाडी गाव एकत्रित झाले आहे.