‘वन वणवा थांबवा, वन्यजीव वाचवा’ या घोषवाक्याप्रमाणे वनविभागाकडून २०२० या सालापासून दरवर्षी वन वणवा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. वणव्यात सध्या अनेक ठिकाणी जंगल जळत आहे. अशा दुर्घटनेत असंख्य वन्यप्राणी मृत्युमुखी पडलेले आहेत. ही जंगले पृथ्वीची फुफ्फुसे आहेत. वणवा रोखणे काळाची गरज बनली आहे. त्यानुसार मलकापूर येथे वन वणवा सप्ताहानिमित्त आनंदराव चव्हाण विद्यालयात जनजागृती व प्रबोधन करणे आवश्यक असल्याने व्याख्यान आयोजित केले.
यावेळी प्राचार्य एस. वाय. गाडे, शेखर शिर्के, वनक्षेत्रपाल अर्जुन गंबरे, वनपाल ए. पी. सव्वाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, वनरक्षक अरुण सोळंकी, सुनीता जाधव, उत्तम पांढरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी वणवा रोखा जंगल वाचवा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. गावोगावी माहिती देण्यात आली. तर वणव्याबाबत प्रबोधन व्हावे म्हणून विद्यार्थिनींची फेरी काढण्यात आली. या फेरीवेळी मलकापूर शहरामध्ये जनजागृतीपर घोषणाबाजी करत प्रबोधन करण्यात आले. यावेळी झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांसह शिक्षक व नागारिकांना वणव्याविषयी माहिती तसेच जनजागृतीपर शपथ देण्यात आली. शासकीय वाहनाने ध्वनिक्षेपक लावून तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वणव्याबाबत जनजागृती व प्रबोधन केले.