वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील आबा अशोक चव्हाण या शेतमजुराच्या शेळ्यांच्या गोठ्यास आग लागून सहा शेळ्या मृत्युमुखी पडल्या होत्या. त्याबरोबरच संसारोपयोगी साहित्यही जळून खाक झाल्याने सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले होते. या घटनेचे वृत्त पंचक्रोशीतील ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी चव्हाण यांच्या कुटुंबाला ५५ हजार रुपयांची मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
आबा चव्हाण यांच्या राहत्या घरासमोरील छपराला लागलेल्या आगीत त्यांची पत्नी व मुलगी जखमी झाली आहेत. तसेच उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या सहा शेळ्या या आगीमध्ये डोळ्यांदेखत होरपळून मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे हातावर पोट असलेल्या शेतमजुराचा जगण्याचा आधार काळाने हिरावून घेतला. या दुःखातून तो खचून जाऊ नये, नाउमेद होऊ नये म्हणून वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व नोकरीनिमित्त अन्य ठिकाणी स्थायिक झालेल्या तरुणांनी मदतीचा हात पुढे केला. गावकऱ्यांच्या या सामाजिक बांधिलकीतून ५५ हजार रुपये जमा झाले. ही रक्कम चव्हाण यांच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आली.
(कोट)
माझ्या कुटुंबावर कोसळलेले संकट फार मोठे होते. नशिब चांगले म्हणून माझी पत्नी आणि बाळ वाचले. शेळ्या मृत्युमुखी पडल्याची बातमी समजताच गावातील, परगावातील लोकांनी मदत देऊन मोठे सहकार्य केले. आधार पाहिजे होता तो मिळाला. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
- आबा अशोक चव्हाण, शेतमजूर