सचिन लाड - सांगली , येळावी (ता. तासगाव) येथे स्कूल बसचालकानेच नऊ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याच्या घटनेने जिल्ह्यातील शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरासह ग्रामीण भागात कोणीही अनधिकृतपणे विद्यार्थी वाहतुकीचा व्यवसाय करु लागला आहे. पालकही जो कमी पैसे घेतो, त्याच्या वाहनातून मुलांना पाठवित आहेत. चालकाचे वर्तन कसे आहे, त्याचे वाहन सुस्थितीत आहे का, याची तपासणी करण्यास ना शाळेला वेळ आहे, ना पालकांना. वर्षातून किमान एकदा तरी चालकाची वैद्यकीय व चारित्र्य तपासणी करण्याचा नियम आहे. मात्र या नियमाचे कुठेही पालन होताना दिसत नाही.आपली मुले ज्या वाहनातून शाळेत जातात, ते वाहन सुस्थितीत व नोंदणीकृत आहे का? याची पालकांनी खात्री केली पाहिजे. मुलांकडे चालकाचे वर्तन कसे आहे, याची चौकशी केली पाहिजे. बेकायदेशीर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अधून-मधून कारवाई केली जाते; मात्र नागरिकांनीही याची पोलिसांना माहिती दिली पाहिजे.जिल्ह्यात एक हजारहून अधिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. साडेतीनशे अधिकृत स्कूल बसेस आहेत. यामध्ये बस, व्हॅन, टाटा मॅझिक, टेम्पो या वाहनांचा समावेश आहे. विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने कशी असावीत, याची शासनाने नियमावली केली आहे. शाळकरी मुलांची वाहतूक करण्याचा व्यवसाय केला जात असेल, तर त्या वाहनाची आरटीओ कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीधारक वाहनांची संख्या अत्यंत कमी आहे. मात्र शहरासह ग्रामीण भागात अनधिकृतपणे विद्यार्थी वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. या वाहनांचे काय? त्यांची तपासणी केली जात नाही. या वाहनांचा परवाना नाही. त्यामुळे शासनाचा कोणताही कर भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तीस ते चाळीस हजाराला वाहन खरेदी केले जाते. पिवळा रंग मारला जातो. पुढे-मागे स्कूल बस लिहिले जाते. ४स्कूल बसमधून मुलींची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असेल, तर या बसमध्ये महिला सहकाऱ्याची नियुक्ती केली पाहिजे. चालकाची वर्षातून एकदा वैद्यकीय व चारित्र्याची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र या दोन्ही नियमांची, ज्या स्कूलबस नोंदणीकृत आहेत, त्यांच्याचबाबतीत अंमलबजावणी होत आहे. ज्या स्कूल बस नोंदणीकृत नाहीत, उदा. व्हॅन, रिक्षा, टाटा मॅझिक, टेम्पो यांच्याबाबतीत हा नियम लागू होत नाही. परिणामी चालकांकडून गैरप्रकार वाढत आहेत.शाळेत समिती नाही४जिल्हास्तरावर स्कूल बस सुरक्षितता समिती आहे. शालेयस्तरावरही समिती नियुक्त करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र केवळ दहा शाळांमध्येच समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्व शाळांत समिती स्थापन झाली, तर विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने कोणती आहेत? चालक कोण आहे? तो जादा पैसे घेतो? याविषयी चर्चा होऊ शकते. रिक्षाचालकांना पसंती४जिल्ह्यात रिक्षाचालकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून शाळकरी मुला-मुलींची वाहतूक केली जाते. मात्र त्यांच्याकडून आतापर्यंत कधीही अपघात झालेला नाही किंवा अनुचित प्रकारही. ते क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थी घालून व्यवसाय करतात, मात्र आजही मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांची त्यांनाच पसंती असल्याचे दिसून येते. ‘रिक्षामामा’ म्हणून ते मुलांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.४सहा महिन्यांपूर्वी सांगलीतील एका नामांकित शाळेच्या स्कूल बसमध्ये विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी शिपायाची नियुक्ती करण्यात आली होती. हा शिपाईच बसमध्ये मुलींना मोबाईलवरील अश्लील चित्रफीत दाखवून त्यांच्याशी अश्लील चाळे करीत होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकाने त्याला बेदम मारहाण करुन पोलिसांच्या ताब्यात दिले. याशिवाय दोनवेळा सांगलीत स्कूल व्हॅनचा अपघात झाला. यात मुले किरकोळ जखमी झाली. या दोन्ही व्हॅनकडे विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसल्याचे आढळून आले होते. त्यानंतर शनिवारी चालकानेच व्हॅनमध्ये तिसरीत शिकणाऱ्या नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. या घटना सातत्याने वाढत असल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आता उपस्थित होत आहे. - दिलीप सावंत, जिल्हा पोलीसप्रमुख तथा अध्यक्ष, जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीनोंदणीकृत स्कूलबसची संख्या कमी आहे. त्यांच्यावर अंकुश ठेवला जातो. अनधिकृत स्कूलबसची तपासणी करण्याची मोहीम सुरू केली जाईल. या वाहनचालकांवर कडक कारवाई केली जाईल. विशेषत: शाळेच्या आवारातच तपासणी मोहीम सुरू केली जाईल. त्यांची वाहने कायमस्वरुपी जप्त केली जातील. - हरिश्चंद्र गडसिंग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समिती
विनापरवाना वाहतूक : चालकाचे चारित्र्य तपासणीचा नियम कागदावरच
By admin | Updated: July 28, 2014 00:03 IST