सातारा : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून वळीवाचा पाऊस होत असून रविवारी सायंकाळच्या सुमारास सातारा शहर आणि परिसराला झोडपले. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात जवळपास तासभर पाऊस पडत होता. पावसामुळे शहरातील वीजपुरवठाही खंडित झाला होता. दरम्यान, खंडाळा तालुक्यातील कवठे येथे झोपडीवर वीज पडली. यामध्ये जेवणास बसलेले दोन शेतकरी ठार झाले.
सातारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून दोनवेळा वळीवाचा पाऊस पडला आहे. गेल्या महिन्यात तर सलग पाच दिवस पाऊस झाला होता. त्यानंतर मागील आठवड्यातही साताऱ्यासह परिसरात आणि जिल्ह्यात वळीवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी साताऱ्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.
सातारा शहर व परिसरात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. मात्र, सायंकाळी चारनंतर अंधारून आले आणि बघता बघता गार वारा सुटून पावसाचे टपोरे थेंब पडू लागले. क्षणार्धात पाऊस धारा जोरात पडू लागल्या. यामुळे बाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. जवळपास ४५ मिनिटे जोरदार पाऊस पडत होता. त्याचबरोबर ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. यादरम्यान, शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. बराच वेळ वीज नव्हती. पाऊस कमी झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला.
मागील काही दिवसांपासून पाऊस होत आहे. रविवारी झालेला पाऊस हा या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात मोठा वळीवाचा पाऊस होता. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तसेच उकाड्याने हैराण झालेल्या सातारकरांनाही दिलासा मिळाला. दरम्यान, सायंकाळी सवापाचच्या सुमारास पाऊस कमी झाला. पण, त्यानंतरही ढगांचा गडगडाट सुरूच होता.
दरम्यान, रविवारी दुपारच्या सुमारास खंडाळा तालुक्यात वादळी वारे सुरू झाले. तसेच हलक्या स्वरुपात पाऊस सुरू झाला. याच दरम्यान, तालुक्यातील कवठे गावच्या हद्दीतील एका शिवारामधील झोपडीवर वीज पडली. यामध्ये जेवणासाठी बसलेले दोन शेतकरी जागेवरच ठार झाले. शशिकांत दादासाहेब लिमण (३५, रा. झगलवाडी) आणि खाशाबा भाऊसो जाधव (६०, रा. कवठे) अशी त्यांची नावे आहेत.
आयकार्ड फोटो..
०२खाशाबा जाधव वीज डेड
०२शशिकांत लिमण वीज डेड
..................................................