पेट्री : शहराच्या पश्चिमेस तीर्थक्षेत्र मोळेश्वर, ता. जावळी येथे ऊर्जा फाउण्डेशनच्या वतीने शेतकरी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. यावेळी शेतकऱ्यांंनी विचारलेल्या अनेक शंकांचे निरसन करण्यात आले.
यावेळी ऊर्जा फाउण्डेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय जंगम म्हणाले, ‘आपण सर्व जण देशप्रेमी आहोत. तेव्हा देशसेवा करायची असेल तर सुशिक्षित तरुणांनी शेतीकडे वळले पाहिजे. विषमुक्त शेती ही संकल्पना राबवून जीवामृत व नैसर्गिक संसाधने यांचा वापर करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शेती करणे ही येणाऱ्या काळाची गरज आहे. या अभियानाची सुरुवात मोळेश्वर येथे करण्यात आली आहे. गटशेतीला जास्तीत जास्त प्राधान्य मिळावे.’
या कार्यक्रमास तहसीलदार राजेंद्र पोळ, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात प्रामुख्याने कोरोना काळात विशेष कामगिरी केलेल्या सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तके उपस्थित मान्यवरांना देण्यात आली.