सातारा : जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर शहरातील वाहतुकीची समस्या सुटण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. नवीन वाहनतळाचा प्रस्ताव नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांच्या उपस्थितीत झालेल्या पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. विरोधकांच्या आक्षेपास नगरसेवक कुमार शिंदे यांनी खुलासेवार उत्तरे दिल्यानंतर ठराव मंजूर करण्यात आला.महाबळेश्वरला दरवर्षी लाखो पर्यटक येतात. सलग सुट्या व हंगामातील गर्दीत वाहने लावण्यास पर्यटकांना अडचणी येतात. हा प्रश्न स्थानिकांसाठीही जिव्हाळ््याचा बनला होता. गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडून अनुदान आले असतानाही राजकीय एकवाक्यता नसल्यामुळे ठरावाबाबत गांभीर्याने विचार होत नव्हता. पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर वाहनतळाबाबत गांभीर्याने विचार करून सत्ताधारी गटातर्फे नगराध्यक्षा तोष्णीवाल यांनी यासंदर्भातील सर्व कागदपत्रे आणि अनुदानाची सांगड घालून हा गहन प्रश्न हातावेगळा करण्याचे ठरविले. सत्ताधारी नगरसेवकांच्या सहकार्यामुळे विशेष सर्वसाधारण सभेत विषय चर्चेस घेण्यात आला.रे गार्डन येथील सिटीसर्व्हे नंबर ५४८ येथे सुमारे चारशे वाहने उभी राहू शकतील असा भूखंड असून, चार हजार चौरस मीटर क्षेत्रात भव्य वाहनतळ उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ९ कोटी ४ लाख ३८ हजार रुपये खर्च अपेक्षित असून, प्रकल्पासाठी शासनाने ५ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. वाहनतळ एकमजली असावे की तीनमजली याबाबत नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये राजकारण रंगू लागल्याने सभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. निविदा मंजूर होते की नाही याबाबत साशंकता निर्माण होत असताना नगरसेवक कुमार शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांची बाजू व उद्देश विषद केला. माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी आपल्या पक्षसदस्यांना पक्षादेश बजावला व वाहनतळ दोनमजली ऐवजी तीनमजली का नसावे, असा प्रश्न उपस्थित केल्याने वातावरण गंभीर झाले. दरम्यान तोष्णीवाल यांनी तीन मजल्यांसंदर्भातील मागणी राज्य सरकारकडे तीन वेळा केली होती; मात्र ती फेटाळली गेली, असे सांगितले. मुख्याधिकारी सचिन पवार यांनीही यास दुजोरा दिल्याने विरोधातील हवा कमी झाली. मात्र, बावळेकर यांनी सभा तहकुबीची मागणी केली. विरोधक मागणीवर ठाम होते, तर जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत दिरंगाई नको, अशी मागणी सत्ताधारी गटाने केली. शिवसेना माजी शहरप्रमुख सुनील साळुंखे, माजी जिल्हाप्रमुख गोपाळ वागदरे, विजय नायडू यांच्यासह अनेक शिवसैनिक तसेच व्यापाऱ्यांतर्फे प्रवीण भांगडिया, मयूर डिकोंडा, हिरो शेख, अजय तोडकर, प्रमोद लोखंडे, अमेय रानडे, सनी उगळे, सचिन वागदरे यावेळी उपस्थित होते. व्यापारी व स्थानिक नागरिकांच्या रेट्यामुळे सत्ताधारी व विरोधकांनी अखेर सर्वानुमते मंजुरी देऊन हा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावला. दोन्ही गटांनी समन्वयाची भूमिका घेतल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)जनरेट्यामुळे अडथळे दूरवाहनतळासंदर्भात राजकारण होत असून, याचा गांभीर्याने विचार करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश कुंभारदरे यांच्या नेतृत्वाखाली सभागृहात प्रवेश करून ठरावास व्यापारीवर्गाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले. प्रकल्पास विरोध न करता तातडीने मंजुरी घ्यावी व प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी, अशी मागणीही शिवसेना कार्यकर्त्यांनी केली. शिवसेनेच्या पवित्र्याने सत्ताधारी गटात समाधान व्यक्त करण्यात आले. तातडीने विषय मंजूर करून घेण्यातील अडथळे त्यामुळे दूर झाले.शहराच्या गरजांचा विचार करून आमदार मकरंद पाटील यांनी माझ्यावर नगराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. वाहनतळाचा प्रस्ताव मंजूर करून त्यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी पूर्ण करताना यश आल्याचा मला आनंद होत आहे.- उज्ज्वला तोष्णीवाल, नगराध्यक्षा
महाबळेश्वरात वाहतूक कोंडी फुटणार!
By admin | Updated: February 6, 2015 00:39 IST