कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले संविधान बदलण्याची ताकद कुणाच्यातही नाही, संविधान बदलण्यासाठी पुढे येणारे हात तोडण्याची ताकद आमच्यात आहे, ज्यांना हे संविधान मान्य नाही, त्यांनी हा देश सोडून जावे, असा इशारा खासदार रामदास आठवले यांनी दिला. रिपब्लिकन पक्षाच्या ‘भारत भीम’ यात्रेच्या निमित्ताने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे शनिवारी कोल्हापुरात आले होते, यावेळी दसरा चौकात झालेल्या समता महापरिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे होते. खासदार आठवले म्हणाले, देशातील सर्व जाती-धर्माच्या भिंती भेदून माणसे जोडणे हा भारत भीमयात्रेचा उद्देश आहे. धर्म, जात, पंथ यावरून होत असलेला संघर्ष थांबावा, या व्यापक विचारासाठी माझा प्रयत्न आहे. देशावर प्रेम करणाऱ्या मुस्लिमांच्या पाठीशी आम्ही आहोत, त्यांनी स्वत:ला असुरक्षित समजू नये, असे आवाहन करत, बाबासाहेबांच्या संविधानामुळे मी पंतप्रधान झालो असल्याचे नरेंद्र मोदी यांनीही मान्य केले आहे. त्यामुळे देशाची लोकशाही प्रगल्भ आहे. या देशावर प्रेम करणाऱ्या मुसलमानांना कोणी धक्का देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही धक्का देऊ, असाही इशारा आठवलेंनी दिला. ‘मनसे’वर हल्लाबोल करताना आठवले म्हणाले, राज ठाकरे यांनी मराठी माणसांवर जरूर प्रेम करावे पण मुंबई ही सर्व भारतीयांची आहे. त्यामुळे मुंबईत व्यवसाय करणारा हा परप्रांतीय असला तरीही तो भारतीयच आहे, याचे भान त्यांनी ठेवावे. ते म्हणाले, रिपाइंमध्ये व्यापक ऐक्य करण्यासाठी सर्व जाती-धर्मांनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न करावेत. या रिपाइं ऐक्याच्या अध्यक्षपदी आपण प्रकाश आंबेडकर यांनी संमती दिल्यास त्यांची नियुक्ती करू. ऐक्य करा, ताकद वाढवा, पुढे ऐक्यातून नेते फुटले तर त्यांना जिल्ह्यात प्रवेश बंदी करा, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, चंदन शर्मा, बी. एम, चव्हाण, संगीता आठवले यांची भाषणे झाली. यावेळी श्यामप्रसाद कांबळे, बी. के. कांबळे, मंगलराव माळगे, डॉ. अनिल माने, कुमार कांबळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
लोणंदसाठी आज मतदान
By admin | Updated: April 17, 2016 00:33 IST