सातारा : सातारा जिल्ह्यात पंधरा दिवस कडाक्याची थंडी पडली होती. कानटोपी, स्वेटर, साॅक्स घातले तरी थंडी जात नव्हती. पण आता गेल्या चार दिवसांपासून स्वेटर घालावेत की रेनकोट घेऊन बाहेर पडावे, असा प्रश्न सातारकरांना सतावत आहे. सलग चौथ्या दिवशी गुरुवारी साताऱ्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर दुपारी तीनच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.
सातारा जिल्ह्यातील वातावरणात आठवड्यात सातत्याने बदल होत आहे. चार दिवसांपासून पहाटेपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून ऊन पडत आहे. गुरुवारीही त्याच पद्धतीचे वातावरण होते. सकाळपासून ढगाळ वातावरण असतानाच दुपारी तीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पाऊस झाला. त्यानंतर ऊन पडले तरी पाऊस सुरूच होता. ग्रामीण भागातून आलेल्यांची यामुळे पळापळ झाली.
चौकट
रुग्ण संख्येत वाढ
वातावरणात सतत होत असलेल्या बदलामुळे रोगराईचे प्रमाण वाढले आहे. थंडी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी सारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे साताऱ्यातील खासगी दवाखान्यांमध्ये रुग्ण संख्येत वाढ होत आहे.