कुडाळ : ‘सन २०२१-२०२२ या महसुली वर्षांपासून सातबारावर पिकाची नोंदणी फक्त मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातूनच होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने स्वतः आपल्या मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ॲप घ्यावे. तलाठी कार्यालयामार्फत आपल्या शेतातील पीकपेऱ्याची माहिती भरली जाणार नाहीत, याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाची माहिती स्वतः भरणे आवश्यक आहेत,’ असे आवाहन तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी केले.
शासनाने जाहीर केल्यानुसार ई-पीक नोंदणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माजी उपसरपंच प्रकाश कदम यांच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन परिसरातील शेतकऱ्यांना तहसीलदार पोळ यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मुख्याधिकारी अमोल पवार, माजी सरपंच डॉ. संपतराव कांबळे, नारायणराव शिंगटे, सुरेश पार्टे, एस. टी. कामगार संघटनेचे नेते शिवाजीराव देशमुख, माजी उपसरपंच प्रकाश कदम, अरविंद जवळ, तलाठी शंकर सावंत, विजय देशमुख, रोहित देशमुख, विशाल कांबळे, यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.