फलटण : आपली पोटाची खळगी भरण्यासाठी बीड, उस्मानाबाद, अहमदनगरमधून दरवर्षी अनेक ऊसतोडणी कामगार आपल्या कुटुंबकबिल्यासह साखरपट्ट्यात येतात. तब्बल सहा महिने ऊस पट्ट्यातील शेतात रात्रं-दिवस कष्ट करून पांढरं सोनं पिकवतात. घरदार, शेतीवाडी सोडून तब्बल सहा महिन्यांचे स्थलांतर या कष्टकरी ऊसतोड कामगारांचे होत असते.
फलटण तालुक्यात पूर्ण क्षमतेने ऊस गाळप करणारे चार मोठे साखर कारखाने आहेत. याशिवाय शेजारील माळेगाव, सोमेश्वर (ता. बारामती) इथूनही ऊसतोड कामगार फलटण तालुक्यात ऊस तोडणीसाठी येतात. शेतातच वस्ती करून राहणारे हे कामगार सहा महिने शहर, गाव यापासून दूरच असतात. सध्या ऊसतोड गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. शेवटचे काही दिवस उरले असतानाच, अनेक ऊसतोडणी कामगारांच्या टोळ्या परतीच्या मार्गावर निघाल्या आहेत. शुक्रवारी दिवसभर अशा अनेक टोळ्या फलटण, बारामती मार्गे नगर, बीडकडे जात होत्या. सहा महिन्यांचे कष्ट घेऊन कमावलेले पैसे मुलीच्या लग्नासाठी, घर बांधण्यासाठी, विहीर पाडण्यासाठी, तसेच कर्ज, शिक्षण या जीवनसंघर्षातून बाहेर पडण्यासाठी वापरणार असल्याचे सांगत, परतीच्या वाटेला लागलेले कामगार ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ असे म्हणत होते. लवकरच कारखाने बंद होतील आणि या कामगारांची धामधूम बंद होईल, मागे उरेल ती फक्त हिरवीगार शेती आणि कारखान्यातील पांढरी शुभ्र साखर.
(चौकट)
सहा महिन्यांतील जमवाजमव...
परतीच्या मार्गावर असणारे ऊसतोडणी कामगार आपल्याबरोबर सर्व जीवनोपयोगी साहित्य घेऊन जातात यात भांडी, अंथरूण पांघरूण, शेळ्या, कोंबड्या, लहान मुले, पाणी पिण्याची भांडी, सरपण आणि बरंच काही. हे सर्व साहित्य सोबतच्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीत ठासून भरले जाते आणि हे सर्व त्या सहा महिन्यांतच गोळा केलेले असते.
फोटो
१४फलटण
फलटण तालुक्यात गळीत हंगाम शेवटचे काही दिवस उरले असतानाच, अनेक ऊसतोडणी कामगारांच्या टोळ्या परतीच्या मार्गावर निघाल्या आहेत.
(छाया : विकास शिंदे)