सातारा : भीषण दुष्काळाच्या दिशेने सातारा जिल्ह्याची वाटचाल सुरू असतानाच परतीच्या पावसाने सुदैवाने जिल्ह्याला तारले आहे. मंगळवारी रात्री व बुधवारी दिवसभरही दुष्काळी भागासह विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. आठवडाभरात ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा वाढला आहे. मंगळवारी दिवसभर व रात्री उशिरापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी मि.मी.मध्ये अशी : सातारा ८.३, जावळी : ८.८, कोरेगाव : ३४.१, कऱ्हाड : १०.९, पाटण : ४.५, फलटण : २२.३, माण : १३.७, खटाव : १०.७, वाई : १२.१, महाबळेश्वर : २८.४, खंडाळा : ३६.२ एकूण : १९० मि.मी. या पावसामुळे धरणसाठ्यांत पाण्याची वाढ होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, पश्चिमेपेक्षा पूर्व भागातील दुष्काळी तालुक्यांवरच पावसाने कृपादृष्टी दाखविल्याने जलयुक्त शिवारमध्ये झालेल्या कामांचा फायदा या तालुक्यांना झालेला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झालेला आहे. (प्रतिनिधी)
परतीच्या पावसाने तारले!
By admin | Updated: September 18, 2015 23:37 IST