सातारा : शाहूपुरीतील मतकर कॉलनी व दत्तछाया कॉलनीमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून पाणीच येत नसल्याने येथील महिलांनी शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन केले. महिलांच्या या पवित्र्यामुळे प्राधिकरण अधिकाऱ्याने दि. १ सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. येथील नागरिकांना पाणीच मिळत नसल्याने नागरिक संतप्त होते. पाण्याची वेळ निश्चित नाही. याबाबत मागणी करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. येथील महिला व नागरिक शुक्रवारी याबाबत ग्रामपंचायतीत गेले. मात्र, पाणीपुरवठ्याबाबत योग्य उत्तर न मिळाल्याने नागरिकांनी याठिकाणी रास्ता रोको केले. या आंदोलनानंतर प्राधिकरणचे लाड याठिकाणी आले. येथील जलवाहिनीचे काम सुरू आहे, त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे त्यांनी सांगितले. परिसरात बोअरवेलची सुविधा नसल्याने नागरिकांना पाणीच मिळत नाही. दरम्यान, याठिकाणी गरज नसताना जलवाहिनी टाकण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला. १ सप्टेंबरपर्यंत जलवाहिनीचे काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनीदिला. (प्रतिनिधी)
शाहूपुरीत पाण्यासाठी महिलांचा रास्ता रोको
By admin | Updated: August 22, 2014 22:05 IST