कोरेगाव : ‘कोयना, धोम व कण्हेर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रशासकीय पातळीवर प्रलंबित आहेत. जिल्हा प्रशासनाने त्यात लक्ष घालून तातडीने ते मार्गी लावावेत,’ अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद आ.
शशिकांत शिंदे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरेगाव तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या
प्रलंबित प्रश्नांसंदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे
यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी कीर्ती
नलावडे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, ज्योती पाटील, सहायक वनसंरक्षक
संजीवन चव्हाण, तहसीलदार आशा होळकर, कृष्णा प्रकल्पग्रस्त विकास व ज्ञान
प्रबोधिनी संस्थेचे पदाधिकारी रघुनाथ सणस, गणेश सणस, संजय शेलार, कृष्णा
शेलार उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले, ‘प्रकल्पग्रस्तांनी त्याग केल्याने आज सर्वत्र
पाणी पाहावयास मिळत आहे. प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रशासकीय
पातळीवर प्रलंबित आहेत. त्यामध्ये विशेष लक्ष घालून, ते प्राधान्यक्रमाने
मार्गी लावणे आवश्यक आहेत. पुनर्वसन विभागाने जलदगतीने प्रकल्पग्रस्तांचे
प्रश्न सोडविणे गरजेचे असून, मंत्रालय पातळीवर जी मदत लागेल, ती मी उपलब्ध करून देईन. मात्र कोणत्याही अडचणी प्रकल्पग्रस्तांना येऊ नयेत,
यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घेणे आवश्यक आहे.
मार्च २०२१ पर्यंत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न जिल्हापातळीवर प्रलंबित
आहेत ते सोडविले जातील. याबाबत आजच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत
असून, लवकर हे विषय मार्गी लागतील, अशी ग्वाही रामचंद्र शिंदे
यांनी दिली. यावेळी विविध प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केलेल्या
प्रश्नांना संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली.
(
चौकट)
रस्त्यांचे जाळे विणणार
कोरेगाव व खटाव तालुक्यांतील जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा
भांडारमाची, गणेश खिंड, वर्धनगड-पांचागणे आळी व हिवरे खिंड रस्त्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. वन विभागाने या रस्त्यांबाबत तातडीने
निर्णय घ्यावा, त्यासाठी आवश्यक ते पत्रव्यवहार करावेत, अशी सूचना करून आ. शशिकांत शिंदे यांनी मतदारसंघात रस्त्यांचे जाळे विणणार असल्याचे
स्पष्ट केले.