सूर्यकांत निंबाळकर, आदर्की स्वत:चे अवघे सातवीपर्यंत शिक्षण झालेले तर पत्नी अशिक्षित; पण त्यांच्याच पोटी जन्म घेतलेल्या सारिकाने मात्र दहावीत तब्बल नव्वद टक्के गुण मिळविले. डॉक्टर बनण्याचं तिनं स्वप्न पाहिलं, ते सत्यात उतरवण्यासाठी पैसा हवाच होता. पैशाचं संकट आलं तेव्हा या पित्याने चक्क मेंढरांचा कळपच विकला. प्रत्येकजण ऐपतीनुसार शिकवण्याचा प्रयत्नही करतो. दस्तुरी येथील जिद्दी बाबूराव उमाजी सूळ यांचा त्याग थक्क करणारा आहे. बाबूराव सूळ यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी शिक्षण सोडून मेंढपाळ व्यवसाय करण्याचा निधार केला. पै-पै गोळा करून त्यांनी मेंढ्यांचा चांगला कळप उभारला. मेंढ्या घेऊन डोंगरांवर त्यांची भटकंती सुरू होती. दिवसभर भटकंती करायची अन् सायंकाळी शेतकऱ्यांच्या रानात मेंढ्यांसह मुक्काम करायचा, तेव्हा धान्य मिळायचं. हा दिनक्रम त्यांचा सुरू होता. त्यांच्या मुली सारिका व रेश्मा शाळा सुटल्यावर किंवा सुटीत मेंढरं हाकण्यासाठी मदत करत होते. सारिकाने आदर्की खुर्द माध्यमिक विद्यालयात नव्वद टक्के गुण मिळविले. तर गणितात दीडशे पैकी दीडशे गुण मिळविले. मुलीची प्रगती पाहून वडिलांनी सारिकाला बारावीसाठी साताऱ्याच्या यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. तेथेही तिला ७५ टक्के गुण मिळाले. सारिकाला डॉक्टर व्हायचे होते; पण त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा लागणार होता. पैशांअभावी शिक्षण राहू नये म्हणून या पित्याने चक्क जीवापाड जपलेली मेंढरं विकण्याचा निर्णय घेतला. बारा वर्षे हा व्यवसाय केलेल्या सूळ यांनी सारिकाच्या उच्च शिक्षणासाठी मेंढ्या विकून पुण्यातील धोंडू मामा मेडिकल कालेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर त्यांनी एका कंपनीत रखवालदाराची नोकरी स्वीकारली. सध्या ते आदर्की बुद्रुक येथील विजय ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत रखवालदाराचे काम करत आहेत. वडिलांनी केलेल्या त्यागाची जाण ठेवून सारिका यांनी जिद्दीने होमिओपॅथीमध्ये पहिल्या क्रमांकाने ती डॉक्टर झाली.
लेकीच्या डॉक्टरकीसाठी मेंढपाळानं विकला कळप!
By admin | Updated: June 19, 2016 00:51 IST