सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमशील योजनांची भुरळ तेलंगणा या नव्याने निर्माण झालेल्या राज्यातील राजकारण्यांना पडली. निमित्त होतं यशदामार्फत आयोजित केलेल्या भेटीचं. तेलंगणा राज्यातील नाडगौंडा जिल्हा परिषदेतील सदस्यांचे शिष्टमंडळाच्या जिल्हा परिषदेला दिलेल्या भेटीचं!केंद्र शासनाच्या योजनेत सातारा जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत संपूर्ण देशातील पंचायत राजमध्ये काम करणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी व कार्यकर्त्यांना उत्सुकता लागलेली आहे. तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर याठिकाणी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली आहे. या व्यवस्थेत काम करणारे सदस्यही नवीन आहेत. महाराष्ट्रात या व्यवस्थेने चांगले मूळ धरले आणि येथील व्यवस्था उत्तम पद्धतीने चालली आहे. त्यातही साताऱ्याचा आदर्श घेण्यासारखा आहे. महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीने सुरू असलेल्या या कामाची पाहणी करून त्याप्रमाणे आपापल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींमध्ये योजनांची अंमलबजावणी करण्याचे धोरण तेलंगणा राज्याचे आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी मंगळवारी आलेल्या या पथकाचे स्वागत केले. शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सतीश चव्हाण यांचीही यावेळी उपस्थिती होती. स्थायी समितीच्या सभागृहामध्ये या पथकातील ४० सदस्यांना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे एन. एल. खाडे इतर अधिकाऱ्यांनी पॉवर पॉइंट पे्रझेंटेशनद्वारे संबंधित पथकाला माहिती देण्यात आली. साताऱ्यातील बचतगट चळवळ, सेंद्रिय शेतीचा प्रयोग, पाणी बचतीसाठी केलेली उपाययोजना आदींची माहिती यावेळी देण्यात आली. यानंतर या पथकाने जिल्हा परिषदेतील विविध विभागांत जाऊन कामकाजाची माहिती घेतली. (प्रतिनिधी)प्रश्नोत्तराचा तासतेलंगणाच्या पथकातील सदस्य उत्सुकतेपोटी अनेक प्रश्न विचारत होते. सर्व सदस्यांना काम करण्यासाठी किती निधी दिला जातो आदी प्रश्नांना सातारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उत्तरे दिली. जाखणगावची पाहणीखटाव तालुक्यातील जाखणगाव या दुष्काळी गावाने लोकसहभागाच्या जीवावर पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळविली आहे. कायम दुष्काळी समजल्या जाणाऱ्या या गावात आता बागायती शेती केली जाते. या गावची पाहणी करण्यासाठी दुपारनंतर हे पथक रवाना झाले. हिंदीतून संभाषणसातारा जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना मराठीत संभाषण करण्याची सवय; मात्र तेलंगणाच्या पथकातील सदस्यांना मराठी समजत नसल्याने अधिकाऱ्यांना हिंदीतून माहिती सांगावी लागली. अधून-मधून इंग्रजी भाषेचा वापरही केला जात होता.
तेलंगणाच्या नेत्यांना साताऱ्याची भुरळ !
By admin | Updated: April 13, 2016 00:11 IST