राजीव मुळ्ये ल्ल सातारासाताऱ्यासारख्या शहरात व्यक्तिगत आर्थिक उत्कर्षाला असलेल्या मर्यादा आणि महानगरांची क्रेझ यामुळे विवाहेच्छू सातारकरांचे विवाह जमण्यात येत असलेल्या अडचणी ‘लोकमत’ने शब्दबद्ध करताच ‘पुण्यात घुसमटलेला सातारा’ बोलू लागला. फोन आणि सोशल मीडियावरून बोलक्या प्रतिक्रिया व्यक्त करतानाच ‘लोकमत’ने एका गंभीर परंतु लपून राहिलेल्या वास्तवाला वाचा फोडल्याची भावना व्यक्त होत आहे.‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या काही प्रतिक्रियांमध्ये महानगरांत होत असलेले उद्योगांचे केंद्रीकरण, त्यामुळे परवडत नसताना करावे लागलेले स्थलांतर, नशिबी आलेली ओढाताण, कुटुंबांचे विभक्तीकरण अशा मुद्द्यांबरोबरच साताऱ्याला मिळालेल्या उपाधीनुसार खरोखरच हे ‘पेन्शनरांचं गाव’ ठरणार का, अशा चिंतातुर स्वरांचाही समावेश आहे.प्रतिक्रिया देणाऱ्यांमध्ये काहींनी शिक्षणानंतर साताऱ्यात नवोपक्रम राबविण्याचा प्रयत्न करून पाहिला. परंतु त्याला सातारकरांकडूनच हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. काहींनी पुण्यात राहून तेथील व्यक्तींची उद्यमशील वृत्ती शिकून घेतली. नंतर साताऱ्यात येऊन काही नवोपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्याही नशिबी निराशाच आली आणि त्यांना पुन्हा पुणे गाठावे लागले. साताऱ्यात मोठ्या प्रकल्पांची उभारणी झाली पाहिजे, उद्योगांचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे, या मागण्यांबरोबरच बदलत्या तंत्रज्ञानाचे ‘प्रात्यक्षिक शिक्षण’ मिळण्याची सोय साताऱ्यात झाली पाहिजे, अशीही अपेक्षा व्यक्त झाली. उदाहरणार्थ, साताऱ्यापासून जवळच शिरवळ-खंडाळा परिसरात अनेक नवे उद्योग उभे राहत आहेत. नोकरीनिमित्त साताऱ्यातून तेथे ये-जा करणे शक्य आहे; परंतु ‘व्हीएनसी’सारख्या नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याची सोय साताऱ्यात नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. क्षमताविकासाबरोबरच क्षमतेचे चीज होणाऱ्या प्रकल्पांची अपेक्षा साताऱ्यातील तरुणाई करीत आहे. पुण्यात राहून संघर्ष करण्यात मोलाची वर्षे वाया चालली असल्याचीही भावना तरुणांमध्ये आहे. ‘पुण्यात फ्लॅट’ ही लग्नाच्या वेळी असलेली अपेक्षा पूर्ण करताना अनेकांना कर्ज काढावे लागते. मर्यादित उत्पन्नात त्याचे हप्ते भरताना हातात फारशी शिल्लक उरत नाही. शिवाय, साताऱ्यात स्वत:चे घर असताना पुण्यात महागडे घर खरेदी करणे अनेकांना निरुपयोगी वाटते.
‘पुण्यात घुसमटलेला सातारा’ बोलू लागला...
By admin | Updated: June 7, 2014 00:09 IST