फलटण : प्रवाशांना केंद्रस्थानी मानून पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देणारा २०१६-१७ साठीचा रेल्वे अर्थसंकल्प रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी संसदेत सादर केला. यामध्ये प्रलंबित लोणंद-फलटण-बारामती या रेल्वे मार्गासाठी २५ कोटींची तर कऱ्हाड-चिपळूण रेल्वेमार्गासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, सातारच्या रेल्वेसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद न केल्याने सातारकर निराश झाले आहेत. लोणंद-फलटण-बारामती या ५४ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गासाठी माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी मोठा संघर्ष केला. १९९६ मध्ये खासदार झाल्यानंतर त्यांनी हा मार्ग मंजूर करून घेतला. सततच्या पाठपुराव्यामुळे लोणंद-फलटण या रेल्वेमार्गाचे काम शंभर टक्के पूर्ण होऊन हा मार्ग रेल्वेगाडीच्या प्रतीक्षेत आहे. तर फलटणपासून बारामतीपर्यंतचा मार्ग बारामतीकरांच्या विरोधामुळे बराच काळ रखडला होता. शेवटी यातून मार्ग काढत नव्या मार्गाला बारामतीकरांनी परवानगी दिली. त्यामुळे फलटण-बारामती रेल्वेमार्गाचे सर्व्हेक्षणाचे जेवढे काम झाले त्यावर त्या मार्गावरील जमीन अधिग्रहनाचे प्रस्ताव पुणे, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. भूसंपादन करताना संबंधितांना किती पैसे द्यायचे, यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र हा मार्ग अडगळीत पडू नये, याची खबरदारी रेल्वेमंत्र्यांनी घेऊन २५ कोटींची तरतूद बजेटमध्ये केली आहे. या निधीतून लोणंद ते फलटण या पूर्ण झालेल्या रेल्वेमार्गावर किरकोळ दुरुस्ती व फलटण-बारामती या मार्गावरील सर्वेक्षण आदी कामे करण्यात येणार आहेत. भविष्यात निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) फलटण-पंढरपूर मार्गाकडे डोळेझाक फलटण-बारामती रेल्वेमार्ग जिवंत ठेवत असताना फलटण-पंढरपूर तसेच बारामती-फलटण-सांगली या जुन्या रेल्वेमार्गांकडे डोळेझाक केली आहे. फलटण ते पंढरपूर या ६० वर्षांपासून रखडलेल्या रेल्वेमार्गासाठी काही तरतूद करण्यात आलेली नाही. अद्याप यावर खर्च टाकण्यात आलेला नाही. कऱ्हाड-चिपळूणसाठी दहा कोटींची तरतूद कऱ्हाड : कोकण रेल्वे ऊर्वरीत महाराष्ट्राशी जोडण्यासाठी कऱ्हाड-चिपळूण रेल्वेमार्ग निर्माण करण्यात येत आहे. त्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्नही सुरू आहेत. या मार्गासाठी नुकताच सर्व्हेही सुरू करण्यात आला होता. अशातच गुरूवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात या मार्गासाठी दहा कोटीची तरतूद करण्यात आली आहे. कोकण रेल्वे कऱ्हाडमार्गे उर्वरीत महाराष्ट्राला जोडण्यासाठी गत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदी असताना त्यासाठी प्रयत्न केले होते. कऱ्हाडला रेल्वेचे जंक्शन करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता. मात्र, दरवर्षीच्या केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गाबाबत निराशा होत होती. मागणी करूनही या मार्गाला मंजुरी मिळत नव्हती. सुमारे तीन वर्षांपूर्वी या मार्गासाठीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही. प्रक्रिया धिम्यागतीने सुरू असताना कोणताच ठोस निर्णय होत नव्हता. गतवर्षीच्या अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गाला हिरवा कंदील मिळाला. तसेच यावर्षीच्या अर्थसंकल्पात मार्गासाठी दहा कोटीची तरतूदही करण्यात आली आहे.
रेल्वे बजेटपासून सातारा कोसो दूर
By admin | Updated: February 26, 2016 00:48 IST