लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : उच्च न्यायालयाच्या दि. ५ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या आदेशानुसार कोरेगाव, फलटण, माण, खटाव व कऱ्हाड या तालुक्यांतील दि. ८ ते ११ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी दि. १६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत रोखून ठेवण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कठापूर, फलटण तालुक्यातील जावली, माण तालुक्यातील पिंगळी (बु.), खटाव तालुक्यातील सातेवाडी व कराड तालुक्यातील पोतले या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांच्या आरक्षणाबाबत उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका दाखल झालेल्या आहेत. सरपंच पदाचे आरक्षण महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१५९ चा मुंबई अधिनियम क्र. ३) मधील कलम ३० (५) व मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील नियमानुसार तालुकानिहाय काढण्यात आले असल्याने उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार या ग्रामपंचायतींच्या याचिकाकर्त्यांची व हितसंबंधितांची याचिकाकर्त्यांच्या अर्जावरील सुनावणी मंगळवार, दि. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी सातारा यांच्या न्यायालयात उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे घेण्यात येणार आहे.
वरील तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित ६ तालुक्यांमध्ये (सातारा, जावली, वाई, महाबळेश्वर, खंडाळा व पाटण ) ग्रामपंचायतींच्या दि. ८ ते १० फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी यापूर्वी देण्यात आलेल्या नमूद आदेशानुसार पार पाडण्यात याव्यात, असे आदेशही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.