चिपळूण : माजी खासदार नीलेश राणे आणि काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्यामध्ये जवळचे संबंध असतानाही मारहाणीचा प्रकार घडल्याने हे संबंध बिघडण्यामागे कारण काय, असा प्रश्न आता प्रकर्षाने पुढे आला आहे. संघटनेतील पद, आमदारकीची उमेदवारी अशी ज्यांच्यावर विशेष मेहेरनजर होती, त्याच सावंत यांना राणे यांनी मारहाण करण्यामागे नेमके काय कंगोरे आहेत, याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेले सात - आठ महिने संदीप सावंत यांनी घेतलेली अलिप्तपणाची भूमिका, पक्षात केली जाणारी गटबाजी आणि मराठा आरक्षण सभेला दाखवलेली अनुपस्थिती, हीच प्रमुख कारणे असल्याचा निष्कर्ष काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी काढला आहे. तालुकाध्यक्ष सावंत व राणे परिवाराशी कौटुंबिक संबंध होते. ज्या ज्यावेळी राणे यांच्यावर विरोधकांनी तोफ डागली, त्या त्यावेळी संदीप सावंत ढाल बनून पुढे उभे राहिले होते. काही महिन्यांपूर्वी नीलेश राणे यांना जिल्हाध्यक्षपद द्यावे, अशी भूमिका मांडण्याचा आटापिटाही सावंत यांनी केला होता. दुसऱ्या बाजूला चिपळूण तालुक्यातील अनेक संघर्षमय स्थितीत राणे यांनी वरिष्ठ नेत्यांचा विरोध पत्करून सावंत यांची पाठराखण केली होती. त्यांना गुहागरमधून विधानसभेची उमेदवारीही दिली होती. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना सावंत वडील मानत होते तर नीलेश राणे हे त्यांच्यासाठी भावासारखे होते. राणे यांच्या प्रत्येक चिपळूण दौऱ्यात संदीप सावंत हजर होते. मात्र, गेले ७ ते ८ महिने तालुकाध्यक्ष सावंत काहीसे नाराज होते. अचानक त्यांनी आपले काम कमी केले. आता तालुकाध्यक्षपदाची निवडणूक जवळ आली आहे. आपण यापुढे शांत राहणार, अशा निर्वाणीच्या गोष्टीही सावंत यांनी सुरू केल्या होत्या. त्यामुळे सावंत यांना मारहाण करण्यामागे केवळ ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत, हा एकच मुद्दा पुरेसा नाही. गेले ७ ते ८ महिने कोंडलेली वाफ या घटनेने बाहेर आली आहे.राणे समर्थक पदाधिकाऱ्यांनी मात्र सावंत यांच्यावर टीका केली आहे. राणे यांची दिशाभूल करून त्यांचे राजकीयदृष्ट्या खच्चीकरण करण्याचाच सावंत यांनी प्रयत्न केला. घर बांधण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली होती. विधानसभा निवडणुकीतही काही लाख रुपये घेतले होते. हे सर्व केल्यानंतरही त्यांनी पक्षनिष्ठा पाळली नाही. ठेकेदार, कंपन्या, उद्योजक यांना धमकावण्याचे अनेक प्रकार त्यांनी केले. वाळू व्यावसायिकांबाबतही त्यांचे वर्तन गैर होते. नीलेश राणे यांना बदनाम करण्याचे हे कटकारस्थान आहे, अशा प्रतिक्रिया माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, शहराध्यक्ष परिमल भोसले, उपनगराध्यक्ष कबीर काद्री, मंगेश शिंदे, राजेश वाजे, वैभव वीरकर, फैसल पिलपिले आदींनी व्यक्त केल्या आहेत. (प्रतिनिधी)रत्नागिरी : मराठा आरक्षणाच्या लढ्यातील राज्यातील पहिली असलेली रत्नागिरीची सभा यशस्वी झाल्याने सेना - भाजपवाल्यांना पोटशूळ झाला आहे. त्यामुळेच त्यांनी संदीप सावंत याच्याशी हातमिळवणी करून आपल्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले आहे. संदीप सावंत याने केलेले आरोप बिनबुडाचे असून, त्यामागे सेना - भाजप असल्याचा गंभीर आरोप कॉँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे यांनी केला आहे. संदीप सावंत याने घर बांधण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली होती. ते त्याला मिळाले नाहीत म्हणून विरोधकांच्या साथीने हा घाणेरडा डाव रचण्यात आला आहे. रत्नागिरीतील मराठा समाजाच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व पुढेही राज्यभरातील सभांना प्रतिसाद मिळेल, या भीतीमुळेच सेना - भाजपवाल्यांनी संदीप सावंतला हाताशी धरून हे राजकारण सुरू केले आहे, असे नीलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे. आजवर घरचा माणूस म्हणून संदीपला सर्वतोपरी मदत केली. त्याला आमदारकीचे तिकिटही मिळवून दिले. विरोध पत्करून त्याला पक्षाचा तालुकाध्यक्ष बनवले. असे असताना सावंत याने हे घाणेरडे राजकारण केले आहे. सावंत याने केलेल्या आरोपांचे उत्तर त्याला कायदेशीररित्या दिले जाईल. संदीप सावंत दारूचा अड्डा चालवतो. तसेच कार्यकर्ते आणि कंत्राटदारांना त्याने छळण्याचे काम केले आहे, असेही राणे यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)पाचजणांविरुध्द गुन्हा दाखलकाँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप शिवराम सावंत यांना मारहाण करुन अपहरण केल्याप्रकरणी माजी खासदार व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नीलेश राणे यांच्यासह पाच जणांवर चिपळूण पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यात माजी खासदार राणे, त्यांचा पीए तुषार, बॉडीगार्ड मनीष व अण्णा, कुलदीप खानविलकर यांचा समावेश आहे. ठाणे येथे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो चिपळूण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, चिपळूणचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप सावंत यांच्याबाबतीत झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्याप्रमाणे गुंडगिरी व दहशत आहे, त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात गुंडगिरी व दहशत चालू देणार नाही. पोलीस नेहमीच राणे कुटुंबियांच्या आमिषाला बळी पडतात. यावेळी पोलिसांनी राणे कुटुंबावर कारवाई केली नाही, तर रत्नागिरी जिल्ह्यात सर्वपक्षीय आंदोलन उभे करून त्याचे नेतृत्व आपण करू.- भास्कर जाधव, आमदार.
संदीप सावंत मारहाणीमागे अनेक कंगोरे, चिपळुणात संमिश्र प्रतिक्रिया
By admin | Updated: April 27, 2016 00:32 IST