मल्हारपेठ : ‘ज्यांच्याकडे सत्ता गेली त्यांना सर्वसामान्यांचं काही देणंघेणं नाही,’ असा टोला माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी लगावला. नावडी वसाहत, ता. पाटण येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नेते तात्यासाहेब दिवशीकर अध्यक्षस्थानी होते. सत्यजितसिंह पाटणकर, सभापती संगीता गुरव, पंचायत समिती सदस्य राजेश पवार, दिनकरराव घाडगे, अॅड. अविनाश जानुगडे, शंकरराव शेडगे, मंगल पाटील, इंदूबाई मुळीक, साहेबराव देसाई आदींची प्रमुख उपस्थिती होती. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, ‘आघाडी शासन घोषणा करणारे आहे. ‘मन की बात मन में ही रहती है’ युती शासनाने घोषित केलेल्या शेततळ्यापैकी तालुक्यात किती तळी आली? असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, शेततळी, पाझर तलाव, लघु पाटबंधारे कामे अजूनही अपूर्ण आहेत. बंदिस्त पाईपलाईन शेतकऱ्यांचा खर्च वाचविणारी आहे. ४० वर्षांपूर्वीच्या जलसिंचन योजना कमकुवत होत आहेत. दुरुस्ती, वीज बिलाचा बोजा व वाया जाणारे पाणी यासाठी बंदिस्त पाईपलाईन योजना ही आमची जुनी संकल्पना आहे.’ यावेळी शंकरराव पाटील, पी. एन. माने, रवी पाटील, बलराज चव्हाण, अभय कुलकर्णी, सचिन माने, मुन्निर मुल्ला, पांडुरंग शेडगे, अविनाश पाटील, टी. डी. नांगरे, शिवाजीराव पाटील आदी उपस्थित होते. नथुराम बोरूगले यांनी प्रास्ताविक केले. माजी सरपंच नथुराम यादव यांनी स्वागत केले. भैय्यासाहेब मुलाणी यांनी आभार मानले. (वार्ताहर)
सत्ताधाऱ्यांना जनतेशी काही देणंघेणं नाही
By admin | Updated: June 17, 2016 23:52 IST