कऱ्हाडात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पारधी मुक्ती आंदोलनाचे प्रकाश वायदंडे, दिलीप सकटे, तालुका उपाध्यक्ष शैलेश भिंगारदेवे, शांताराम थोरात, बहुजन समता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र दाभाडे, अशोक बडेकर, राहुल वायदंडे आदी उपस्थित होते.
प्रा. मच्छिंद्र सकटे म्हणाले, नाशिक येथे मार्च महिन्यात २६, २७ व २८ तारखेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. विज्ञानवादी लेखक जयंत नारळीकर हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. या संमेलनात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याचा ठराव करावा, अशी आमची मागणी आहे. अण्णाभाऊ साठेंचा विचार दलित महासंघाने प्रमाण मानला आहे. फुले, आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर चालणारी ही संघटना आहे. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि अण्णाभाऊंनी त्यांच्या लेखनातून साहित्याचे समाजशास्त्र मांडले आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळ हे मराठी भाषेचे आम्हीच प्रमुख आहोत, या आविर्भावात काम करीत आहे.
मराठी भाषेचे पहिले साहित्य संमेलन १८७२ साली झाले होते. तेव्हापासून ही साहित्य परंपरा सुरू आहे. १९९७ साली अहमदनगरला जे संमेलन झाले त्या संमेलनावर दलित महासंघाने मोर्चा काढला होता. अण्णाभाऊंचे स्मारक वाटेगावला उभारावे, अशी आमची त्यावेळी मागणी होती. १९९८ साली परळीतील संमेलनावेळीही आम्ही मोर्चाचा इशारा दिला होता. २००० साली बेळगावला संमेलन झाले होते. त्याठिकाणीही मोर्चा काढण्याचे आम्ही नियोजन केले होते. मात्र, संमेलनाध्यक्ष य. दि. फडके यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते आंदोलन आम्ही स्थगित केले होते. आम्ही सातत्याने अण्णाभाऊंच्या सन्मानासाठी लढत आहे. कऱ्हाडला २००३ साली संमेलन झाले होते. त्यामध्ये हिंदुत्वापेक्षा माणुसकी श्रेष्ठ असल्याचा ठराव करावा, यासाठी आम्ही आंदोलन केले होते. ते आंदोलन लक्षवेधी ठरले होते. यंदा नाशिकला संमेलन होणार असून अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याचा ठराव त्या संमेलनात करावा, अशी आमची मागणी असून, कुसुमाग्रजांच्या घरापासून आम्ही हा मोर्चा काढणार आहोत, असेही प्रा. मच्छिंद्र सकटे यावेळी म्हणाले.