लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा
सातारा जिल्ह्याच्या राजकारणात राजे आणि सरदार घराण्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले, फलटणमध्ये रामराजे निंबाळकर, संजीवराजे, रघुनाथराजे तर पाटणमध्ये विक्रमसिंह पाटणकर यांचे प्राबल्य असल्याचे पाहायला मिळते. यांच्याशी जुळवून घेत सर्वसामान्य कुुटुंबातील घराणीही राजकारणात आली आणि राज्यकर्तीही बनली. अलीकडे राजेंनी पक्ष बदलले. काही बदलण्याचा मानसिकतेत होते त्यांनी मानसिकता बदलली. सर्वसामान्यांतून तयार झालेले नेतृत्व राष्ट्रवादीशी ठाम राहिले. राजेंनी पक्ष बदलला तरी त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते अजूनही राष्ट्रवादीतच आहेत. याच शिलेदार आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रावादी सावरली; पण, जिल्ह्याचे नेतृत्व देण्यात अजूनही यश आलेले नाही.
भाजपमध्ये दाखल झालेले खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली तरी त्यांची आचारसंहिता आणि विचारशैली अजूनही स्वीकारलेली नाही. खासदार उदयनराजे तर तसे कोणाला गिणतच नाहीत. त्यांनी शुक्रवारी (दि. ८) ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनाला उशीर होतोय असे लक्षात येताच स्वत:च उद्घाटन उरकून टाकले. त्यानंतर मंत्रिमंडळातील प्रवेशाबाबत त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘हे मित्रच माझे मंत्रिमंडळ आणि मीच त्यांचा मंत्री.’ अशा रोखठोक उदयनराजेंपुढे भाजपची विचारसरणीही फार टिकाव धरत नाही. मुळात राजे मंडळी भाजपमध्ये गेली ते काहीतरी मिळविण्यासाठी गेली. सातारा शहराच्या विकासात काही भर घालता येईल म्हणून त्यांचा प्रयत्न असला तरी ती तात्पुरती सोय होती. हाती काहीच आले नाही. उलट राष्ट्रवादीकडूनच पाठपुरावा करून उरलेली कामे पूर्ण करावी लागली.
खासदार उदयनराजेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजे आणि शिलेदारांचाही विरोध होता. तरीही उदयनराजे बाहेर पडले तर एक मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावेल म्हणून शरद पवार यांनी त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. त्याचा परिणाम उलट झाला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले विधानसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपमध्ये गेले. रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे विधान परिषदेचे अध्यक्षपद होते, त्यामुळे ते कायम ठेवण्याच्या अटी, शर्तीवर ते एक पाऊल इकडे एक तिकडे अशा मानसिकतेत होते. पण, त्यांनी आपल्या स्वभावधर्माप्रमाणे अखेरच्या क्षणापर्यंत वाट पाहिली आणि ते शांत झाले.
नेत्यांसोबत त्यांचे कार्यकर्तेही त्या त्या पक्षांमध्ये जाताना दिसतात; पण, साताऱ्यात अजबच घडले आहे. नेते भाजपमध्ये आहेत; पण कार्यकर्ते अजूनही आपण भाजपमध्ये गेलेलो नाही, असे ठामपणे सांगत आहेत. आम्ही आमच्या नेत्यांसोबत आहोत; पण भाजपमध्ये नाही हेदेखील ठणकावून सांगायला ते मागे-पुढे पाहत नाहीत. नेतेही कार्यकर्त्यांना फारसे ताणून धरत नाहीत. परतीचे दोर अजूनही त्यांनी कापून टाकलेले नाहीत. त्यामुळे प्रत्येक खेळी जपून खेळली जात आहे.
भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर राजेंनाही विजयासाठी संघर्ष करावा लागलाच. पण, मंत्रिपद एक पाऊल दूर असतानाच काही राजकीय घडामोडींमुळे सर्व अपेक्षांवर पाणी फिरले. तरीही या नेत्यांनी हार मानली नाही. आमचे तुमच्याशी कधी वैर नव्हतेच; अशा आविर्भावात सर्वजणांनी सत्ताधाऱ्यांशीही जुळवून घेतले. खासदार उदयनराजे मात्र सत्ताधारी केंद्रातील असोत अगर राज्यातील; इथे आपलीच सत्ता, अशाच वातावरणात वावरतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही सत्तास्थानाचा किंवा मंत्रिपदाचा कधीच मोह राहत नाही. सध्याही अशीच स्थिती आहे.
राजे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले तरी शिलेदार आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी सोबत राहिले. त्यांनीच सांभाळलेली राष्ट्रवादी आता जिल्ह्यात सशक्त होऊ लागली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून एक एक ग्रामपंचायत पुन्हा स्थानिक कार्यकर्ते आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याठिकाणी कोणीही भाजप, शिवसेना किंवा राष्ट्रवादी म्हणून न लढता नेत्यासाठी लढत आहे. नेतेही कोणीही निवडून आला तरी आपलाच याच भावनेत आहेत. पण, हीच वेळ राष्ट्रवादीला गावागावांत पुन्हा पक्षाची नवीन फळी तयार करण्याची संधी होती. ही संधी त्यांनी साधली नाही. त्यामुळे आता पुढील काळात त्यांना अधिक धावपळ करावी लागणार आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांना चार्ज करण्याची आवश्यकता
जिल्ह्यातील शिलेदारांवरच आता या जिल्ह्यातील पक्षसंघटना मजबूत करण्याची जबाबदारी आहे.पण, अजूनही त्यांनी आपल्या मतदारसंघाबाहेर पाऊल ठेवलेले नाही. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्याचा नेता पाहिजे आहे. तो अजूनही मिळालेला नाही. पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर बाळासाहेब पाटील यांनी जो दरारा ठेवला पाहिजे तो अजिबात पाहायला मिळत नाहीत. ते आपल्याच कोशात आहेत. मकरंद पाटील मतदारसंघ पिंजून काढतात; पण त्याच्याबाहेर त्यांनी आपले कार्यक्षेत्र वाढविण्याची आवश्यकता आहे. शशिकांत शिंदे नेमके कोरेगाव पाहणार का जावलीतही लक्ष घालणार याबाबत त्यांचीच द्विधा मन:स्थिती आहे. पाटणकर आपल्याच मतदारसंघात गुरफटून पडले आहेत. त्यामुळे दोन्ही राजे बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीला एकवटण्याची आवश्यकता होती, ती पूर्ण झालेली नाही.