सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी रविवारी पाऊस झाला. दुष्काळी तालुक्यातही हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांसाठी दिलासा मिळाला आहे तर रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस होत आहे. पूर्वभागात अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तर पश्चिम भागातही चांगला पाऊस झाला. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे १४, नवजाला ४१ आणि महाबळेश्वरला ४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३६२५ मिलीमीटर, नवजा येथे ४८१० आणि महाबळेश्वरला ४९५० मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. सातारा शहरातही पावसाच्या हलक्या सरी पडल्या.
दरम्यान, कोयना धरणात ९३.९८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे तर पावसामुळे धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे तसेच जिल्ह्याच्या प्रमुख धरणांत पाणीसाठा वाढू लागला आहे.
.................................................