कुडाळ : गेल्या दोन दिवसांपासून कुडाळसह परिसरातील वातावरणात बदल झाला आहे. गारठा आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बीच्या पिकांवर परिणाम होऊ लागला आहे. ज्वारी, गहू, हरभरा ही पिके चांगली आली असून बदललेल्या वातावरणामुळे ज्वारीच्या पानांवर चिकटा, मावा कीड पडल्याचे दिसत आहे. गहू पिकावर तांबेरा तर हरभऱ्यावर घाटेअळी पडण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
शेतकरी चिंताग्रस्त
सातारा : बाजारपेठेत टोमॅटो, कोथिंबीर, भेंडी, मेथी यांसह अनेक पालेभाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. बाजारपेठेत टोमॅटो १० रुपये प्रति किलो या दराने विकला जात आहे, तर कोथिंबीरीच्या दोन पेंड्या दहा रुपयांना मिळत आहेत. दर उतरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना मात्र याचा फटका बसला आहे.
जनावरांचा अडथळा
सातारा : शहरातील महात्मा फुले भाजी मंडई व तहसील कार्यालय परिसरात सध्या मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मंडई परिसरात कचरा कुंडी नसल्याने शेतकऱ्यांकडून विक्रीयोग्य नसलेला भाजीपाला रस्त्यावरच टाकला जातो. हा भाजीपाल खाण्यासाठी भटकी जनावरे याठिकाणी येत असतात. या जनावरांची वाहतुकीला देखील अडचण निर्माण होत आहे.
खड्ड्यांचे साम्राज्य
सातारा : मोळाचा ओढा ते वर्ये या मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेकदा छोटे-मोठे अपघात होऊ लागले आहेत. बांधकाम विभागाने येथील खड्डे मुरूम अथवा खडी टाकून तात्पुरत्या स्वरूपात मुजविले होते. मात्र, काही दिवसांतच परिस्थिती जैसे थे झाली आहे.