उंडाळे : ‘कऱ्हाड दक्षिण मतदार संघाने माझ्यावर नेहमीच प्रेम केले आहे. माझा परिचय नसतानादेखील मला राजकारणात महत्त्वाची मदत केली आहे. त्या उपकाराची मी निश्चित परतफेड करीन. त्याचाच एक भाग म्हणून चांदोली धरणातून येवती-म्हासोली मार्गे पाणी आणण्याबाबत आश्वासक मार्ग निघाल्यास कऱ्हाड दक्षिणचा डोंगराळ भाग ओलिताखाली आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.सवादे येथील विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच येळगाव जिल्हा परिषद मतदार संघातील गावांचा थेट संवाद-चर्चा कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी वनमंत्री पतंगराव कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, आमदार आनंदराव पाटील, अमदार जयकुमार गोरे, मदनराव मोहिते, जयवंत जगताप, मनोहर शिंदे, बाळासाहेब थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘ग्रामीण भागाचा विकास करताना सहकारी क्षेत्राची बळकटी करणे महत्त्वाचे आहे. त्याच बरोबर सर्व पायभूत सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे़ महाराष्ट्राचा सर्वाधिक उत्पन्न मिळवून देण्यात प्रथम क्रमांक लागतो़ राज्यातील शेतकऱ्यांसाठी १२ हजार कोटींची मदत दिली़’ वनमंत्री पतंगराव कदम, गृहमंत्री सतेज पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रा. ए. जी. थोरात यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच सचिन थोरात यांनी आभार मानले. कार्यक्रमास सरपंच शिवाजी थोरात, पै. नाना पाटील, अशोक भावके, नितीन थोरात, प्रशांत थोरात, सदाशिव शेवाळे, भास्कर शेवाळे, यांच्यासह विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)मदनदादांची फटकेबाजीज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांनी कार्यक्रमामध्ये अपेक्षेप्रमाणे राजकीय फटकेबाजी केली. कऱ्हाड दक्षिणमध्ये विकासाचा डोंगर उभारला असे म्हणणाऱ्या उंडाळकरांचा नामोल्लेख न करता ‘तुमचे आकडे लाखांत होते, मुख्यमंत्री बाबांचे कोटीत आहेत,’ असा चिमटा त्यांनी घेतला. तसेच पारतंत्र्यात असणाऱ्या उंडाळे परिसरातील लोकांना बाबांनी भयमुक्त केले आहे, असे सांगून दक्षिणच्या निवडणुकीतील अनिश्चितीचे सावट दूर करण्याचा प्रयत्न केला. भांडणे लावणाऱ्यांचे दुकान बंदकऱ्हाड तालुक्यात आपल्या महाआघाडीच चांगले चालले आहे; पण ते अनेकांना खुपत असल्यामुळे काहीजण भांडण लावण्याचं दुकान सुरू करीत आहेत. आनंदराव पाटीलच आमदार का? असा पोटशूळ काहीना उठला असून भांडणे लावणाऱ्यांचे उद्योग करणाऱ्यांचे दुकान आता जनताच बंद करेल, असा विश्वास मदनराव मोहिते यांनी यावेळी व्यक्त केला. ४५ गावांतील ग्रामस्थांसाठी चार तासथेट संवाद कार्यक्रमात येळगाव, उंडाळे, सवादे परिसरातील सुमारे ४५ गावांतील ग्रामस्थांशी मुख्यमंत्र्यांनी थेट संवाद साधला. या भागात आजपर्यंत काय झाले, यापेक्षा गेल्या साडेतीन वर्षांत माझ्यामुळे काय झाले, याची माहिती घ्यायला अन् तुमच्या अपेक्षा काय आहेत, हे जाणून घ्यायला आलो आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या आटोपशीर भाषणात सांगून जाहीर कार्यक्रम थोडक्यात आटोपता घेतला आणि रात्री ९.१५ पर्यंत प्रत्येक गावातील शिष्टमंडळाला स्वतंत्र भेटून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
दक्षिणचा डोंगरी भाग ओलिताखाली आणणार-पृथ्वीराज चव्हाण :
By admin | Updated: July 28, 2014 23:15 IST