प्रमोद सुकरे - कऱ्हाड -आचारसंहिता लागण्यापूर्वीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे जिल्हापरिषद गटनिहाय थेट संवाद कार्यक्रम झाले़; पण काले जिल्हा परिषद मतदारसंघात हा सुसंवाद झालाच नाही़ गुरूवारी (दि़ १८) मुख्यमंत्री कालेत जाहीर मेळावा घेणार आहेत़ राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या या ‘मिशन काले’कडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे़ काले हे तालुक्यातील लोक संख्येने मोठे आसणारे एक गाव. राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणूनही गावाची ओळख आहे़ आजवर या गावाने काँग्रेसची विचारसरणी जोपासण्याचेच काम ‘अपवाद’ वगळता केले आहे़ जिल्हा परिषद मतदारसंघावर ज्येष्ठ नेते भीमराव पाटील यांचेच एकहाती वर्चस्व २०१० पर्यंत राहिले आहे़ त्यानंतर थोडी पडझड झाली असली तरी, ‘दादा’ नावाचा दबदबा आजही आहे़ काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी अनेक पदेही भूषविली आहेत़ पण अंतर्गत वादातून त्यांची बदलती भूमिका सध्या चर्चेचा विषय बनली आहे़ त्या पार्श्वभूमीवर कालेत होणारा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे़पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर भीमराव पाटील त्यांच्या सोबतच होते़ मात्र गेल्या ४ वर्षात काँग्रेस विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या काल्यात त्यांचा एकही कार्यक्रम झाला नाही! वर्षभरापूर्वी राजस्व अभियानांतर्गत मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम कालेत होणार अशी चर्चा होती; पण तो ओंडमध्ये सरकला़ तेव्हापासून या दादांची ‘सटकलीय’ म्हणे! त्यामुळे हे दादा ‘इंजिनिअर बाबां’ऐवजी, ‘डॉक्टर बाबां’च्या व्यासपीठावर दिसतात़ पण ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम ओंडमध्ये घेतला, तेही आज मुख्यमंत्री बाबांबरोबर दिसत नाहीत, हेही खरे! मध्यंतरी मुख्यमंत्र्यांचे थेट संवादाचे कार्यक्रम झाले; पण कालेचा नंबर आला अन तो रद्द झाला़ दादांचेच पुतणे पै़ नाना पाटील यांनीच या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता़ प्रासंगिक कारणाने मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याचे तेव्हा सांगण्यात आले़ तेव्हापासून काल्यात मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम कधी, याबाबात उलटसुलट चर्चा सुरू झाली़ गुरूवारी ‘कर्मवीरांच्या कर्मभूमीत काँग्रेसचा कार्यक्रम’ होत आहे़ याला भागातील कोणते ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार? काय-काय घडामोडी घडणार, याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे़ लोकसभेला भरली होती ‘किटली’त वाफ काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत याच कालेकरांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार पुरूषोत्तम जाधव यांच्या ‘किटली’त वाफ भरत ‘घड्याळा’चे काटे उलटे फिरवण्याचा प्रयत्न केला होता़. कालेकरांची ही बदलती राजकीय भूमिका दक्षिणच्या राजकारणात नवे वळण घेईल़, अशी अटकळ तेव्हापासून बांधली जात होती़ आता हे कालेकर काँग्रेसच्या हातात ‘हात’ घालणार की, काँग्रेसलाच ‘हात’ दाखविणार हे लवकरच कळेल़
पृथ्वीराज बाबांचे आज ‘मिशन काले’
By admin | Updated: September 17, 2014 22:29 IST