नवनाथ जगदाळे -- दहिवडी नगरपंचायत झाल्याने सर्वच राजकीय आडाखे बदलले असून, पहिला नगराध्यक्ष होण्यासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. या सर्व घडामोडीत जिल्हा परिषद दहिवडी गट मात्र रद्द होणार आहे. असे असले तरी पंचायत समिती गण वावरहिरे अबाधित राहणार असल्याने व फेब्रुवारी २०१७ पर्यंत पुन्हा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असल्याने तो पर्यंत अभय मिळणार का ? हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.बिदाल या गावाला प्रथमच जिल्हा परिषद सदस्य होण्याची संधी मिळणार आहे तर दहिवडीमध्ये पहिला नगराध्यक्ष कोण होणार याबाबत सर्वच पारावर चर्चा रंगताना दिसत आहेत. प्रशासक म्हणून सुरेखा माने यांनी कार्यभार हाती घेतला आहे. वॉर्डरचना नव्याने कराव्या लागणार आहेत. नवीन वॉर्ड ऐवजी प्रभाग पद्धत लागू होणार असून, एकूण जवळपास १७ सदस्य असणार आहेत. सॅटेलाईटवरून नव्याने प्रभागरचना झाल्यास पारंपरिक वॉर्डरचना बदलणार आहे. त्यामुळे अनेकांची मक्तेदारी मोडीत निघणार आहे. नगरपंचायतीमुळे दहिवडीचा झपाट्याने विकास होईल, अशी चर्चाही रंगू लागली आहे. दहिवडीतील अनेक प्रश्न मोठ्या निधीची कमतरता असल्यामुळे प्रलंबित आहेत. नाना-नानी पार्क, क्रीडासंकुल, रिंगरोड, भुयारी गटर योजना, चिल्ड्रन पार्क यासाठी निधीचा मार्ग मोकळा होणार आहे. नगरपंचायतीची मुख्य रस्त्याच्या बाजूने असणारी जागाही भविष्यात गाळे काढून विकसित करण्यासाठी निधी मिळू शकतो. पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन सोपे होणार आहे. असे असले तरी अद्याप नगरपंचायत झाल्याने नेमके राजकीय गणित काय असणार, वॉर्ड रचना कशी असणार, नगराध्यक्षाचा मान कोणाला मिळणार, निवडणुका कधी होणार? हे प्रश्न अजुनतरी अनुत्तरीत आहे. दहिवडी नगरपंचायत होण्यासाठी नेहमी पाठपुरावा केला .मला सरपंचपद १ वर्ष मिळाले. या वर्षात गटारे सफाई, घंटागाडी, ५ नवीन बंधारे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. दहिवडी गावाला नियमित पाणी पुरवठा केला. यामध्ये सर्वच सदस्यांनी मला मोलाचे सहकार्य केले. माझे सरपंचपद गेले तरी गावच्या विकासाच्या दृष्टीने नगरपंचायत झाल्याचा मला आनंद आहे. आमचे नेते शेखर गोरे, वाघोजीराव पोळ (काका) यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ केल्याचा अभिमान आहे.- अर्चना महाडिक, विद्यमान सरपंच,दहिवडी नगरपंचायत झाल्याने वाढीव निधी मिळणार आहे. दहिवडी हे तालुक्याचे ठिकाण आहे. अनेक नोकरदार वर्ग निवृत्त झाल्याने मुलांच्या शिक्षणासाठी दहिवडी शहराची निवड करीत असतो. त्यामुळे दहिवडीचा विस्तार झपाट्याने वाढत चालला आहे. भविष्यात या सर्व लोकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी मोठ्या निधीची गरज भासणार आहे. त्यामुळे आतापासून नियोजन झाल्यास या शहरावर ताण येणार नाही. नगरपंचायतीमुळे हे प्रश्न मिटू शकतील.- धनाजी जाधव, माजी सरपंच, दहिवडी सभापती पदाचे स्वप्न भंगले..!गेली ३० वर्षे दहिवडी गावाला पंचायतीचे सभापती व उपसभापती पद मिळाले नव्हते, दहिवडीचे पंचायत समिती सदस्य अतुल जाधव यांची नुकतीच उपसभापतिपदी वर्णी लागली होती. आमदार जयकुमार गोरे यांचे समर्थक व विश्वासू असणारे जाधव यांनी कामाचा चांगला झपाटा लावला होता; परंतु अवघ्या ६ महिन्यात त्यांना या पदापासून हटावे लागणार आहे.
नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची प्रतिष्ठा पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2016 00:10 IST