वाई : गेली काही दिवस ढगाळ वातावरण असतानाच गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास वाई शहरासह परिसरात वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे; परंतु अचानक आलेल्या वाऱ्यासह पावसाने ज्वारी, गहू, हरभरा या रब्बी पिकांसह भाजीपाल्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आंब्याचा मोहर गळून गेला आहे.
जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून या वातावरणामुळे पिकांवर विविध रोग पडत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या ही मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यामध्येच गुरुवारी दुपारी वाई शहरासह तालुक्याच्या काही ठिकाणी जोरदार वारा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून थोडाफार दिलासा मिळाला.
पावसाआधी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडांना नुकतेच लागलेले आंबे व मोहर खाली झडून गेला आहे. ढगाळ वातावरण असेच राहिल्यास आंबा उत्पादन अडचणीत येईल अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. जनावरांसाठी ठेवलेला चारा भिजला असला तरीही नुकसान मात्र झाले नाही. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेमध्ये व्यापारी व नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. अवकाळी पावसाच्या सरी वाई शहरासह वाईच्या पश्चिम भागात पाचवड येथे जवळपास एक तास पडत होत्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.