ग्रामपंचायत निवडणुका निर्भय वातावरणात पार पडाव्यात, यासाठी खेड बुद्रुक येथे दंगा काबू पथकातील जवानांनी संचलन केले. यामध्ये अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. (छाया : संतोष खरात)
०००००
वाहनचालकांचा स्टंट
सातारा : शहरातील राजपथावर रात्रीच्या सुमारास युवकांकडून दुचाकीवर बसून स्टंटबाजी सुरू असते. अशा हुल्लडबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. राजपथावर रात्री नऊनंतर काही युवक दुचाक्या बेफामपणे चालवत येत असतात.
०००००००००
बेशिस्त वाहनतळ
सातारा : जिल्हा परिषदेच्या पार्किंगमध्ये दुचाकी अस्ताव्यस्त लावण्यात येत आहेत. त्यामुळे गाड्या काढताना व उभ्या करताना अडचणी निर्माण होत आहेत. याप्रकरणी संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे. या ठिकाणी नोकरदार दुचाक्या लावतात. तसेच कामानिमित्त येणाऱ्यांच्या गाड्या असतात. पण, अनेकवेळा पार्किंगमध्ये जागा उरत नाही.
०००००००
रस्ते खड्डेमय
सातारा : सातारा शहरातून कोरेगावकडे जाण्याच्या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविणे अवघड झाले आहे. संबंधितांनी रस्त्याची दुरवस्था थांबवावी, अशी मागणी होत आहे. कृष्णानगर येथील कालव्यापासून कृष्णा नदीच्या पुढील काही अंतरापर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.
०००००००००
चौकामध्ये अस्वच्छता
सातारा : सातारा शहरातील अनेक स्वच्छतागृहाशेजारी कचरा, घाण टाकण्यात येत आहे. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. संबंधितांनी या ठिकाणची स्वच्छता वारंवार करावी, अशी मागणी होत आहे. काही नागरिक कचरा, घाण आणून टाकतात, तर भटकी कुत्री कचरा विखरुन टाकत असतात.
०००००००००
दिवसाही पथदिवे सुरू
सातारा : साताऱ्यातील पोवई नाका ते जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील पथदिवे शुक्रवारी सकाळीही सुरू होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास दोन्ही बाजूचे दिवे सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. याबाबत काहीजणांनी संबंधित विभागाला मोबाईलवरुन माहिती देण्याचाही प्रयत्न केला.
००००००
शाळा बंद असल्याने मुलंही कंटाळली
सातारा : कोरोनानंतर मार्चपासून जिल्ह्यातील सर्वच शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा बंद असल्याने मुलं घरात असून, त्यांना मैदानावरही जाता येत नव्हते. आता मैदाने सुरू केली आहेत. मात्र सवंगड्यांची भेट होत नसल्याने नागरिक कंटाळले आहेत. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
००००००००
पावसामुळे घसरगुंडी
सातारा : साताऱ्यातील अनेक भागात रस्त्याचे काम झाले आहे. त्यामुळे वाहने सुसाट धावत असतात. मात्र पावसामुळे रेती वाहून आली आहे. त्यामुळे दुचाकी वाहने वळणावर घसरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
०००००००००
पिशव्यांसाठी पोते
सातारा : कापड दुकानांतील वस्तू प्लास्टिकच्या पोत्यात बांधून येत असतात. या पोत्यापासून आता अनेक व्यापाऱ्यांनी पिशव्या बनवून घेतल्या आहेत. या पिशव्यांमधूनच ग्राहकांना वस्तू दिल्या जातात. त्यामुळे आजवर टाकून दिल्या जात असलेल्या वस्तूंचा वापर चांगल्या कामासाठी होऊ लागल्याने कौतुक होत आहे.
०००००००
सैदापूर रस्त्यावर धोका
सातारा : सातारा-सैदापूर रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या कामासाठी आणून ठेवलेली माती, रेती, दगड गोटे रस्त्याच्या कडेलाच पडलेले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांमध्ये अपघातांचा धोका व्यक्त केला जात आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.
००००००००
कपड्यांचे वाटप
सातारा : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी साताऱ्यात बुधवारी गरीब, अनाथ लोकांना थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून कपड्यांचे वाटप केले. यावेळी अतिश ननावरे, शिवाजी सावंत, नंदू केसरकर, नीलेश मोरे, नीलेश चित्रगार, बाबा गुजर उपस्थित होते.
०००००००
कोरोना लसीकरणाबाबत उत्सुकता
सातारा : कोरोनावर लसी शोधण्यात यश आले असून, ती देण्यास लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र ही लस कशाप्रकारची असेल, याची उत्सुकता लागून राहिली आहे. ही लस तोंडातून थेंब पद्धतीने देण्यात येणार आहे की इंजेक्शनद्वारे देण्यात येणार आहे. याबाबत काहीही ठोस सांगितले जात नसल्याने लसीकरणाबाबत सर्वत्र चर्चा रंगायला लागली आहे. याबाबत उत्सुकता लागली आहे.
०००००००००००
यात्रांवर परिणाम
सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील यात्रांवर परिणाम झालेला अनुभवास मिळत आहे. त्यामुळे खेळण्या, खाऊचे गाडे, किरकोळ विक्रेत्यांवर झालेला जाणवत आहे. या व्यावसायिकांना घरातच बसावे लागत असल्याने चांगला हंगाम हातातून गेला आहे.
००००००००
हेल्मेट सक्ती गरजेची
पाचगणी : महाबळेश्वर, पाचगणी हे जागतिकस्तरावरील पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे येथे विविध भागातून पर्यटक येत असतात. मात्र येथील स्थानिकच दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करत नाहीत. त्यामुळे अपघातात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. साहजिकच हेल्मेट सक्तीच करण्याची मागणी होत आहे.
०००००००००
एसटी महामंडळाचा यात्रांचा हंगाम वाया
सातारा : सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील सिद्धनाथ, पाल येथील खंडोबा यात्रा, मांढरगडावरुन मांढरदेवाची यात्रा दरवर्षी याच काळात होत असते. त्यामुळे अनेक भाविक एसटीनेच त्या ठिकाणी येत असतात. यासाठी एसटी महामंडळाच्या विविध आगारातून जादा गाड्या सोडल्या जातात. त्यातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला जात आहे. त्यामुळे एसटीचा हंगाम वाया गेला आहे.