पळशी : माण तालुक्यातील पळशी येथील नदीपात्रातून जाणाऱ्या पाणीपुरवठा पाईपला गळती लागल्यामुळे पाणी वाया जात होते. दुष्काळात या ठिकाणी भीषण पाणीटंचाईला लोकांना सामोरे जावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. जनावरांना पिण्यास पाणी मिळत नाही, त्यामुळे प्रशासनाला येथे टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो.पळशी गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नदीपात्रातून जाते. याठिकाणी लोखंडी पाईपला लागलेल्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’ने दि. ९ जानेवारीच्या अंकात प्रसिध्द केल्यानंतर पाण्याचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायतीने तत्काळ उपाययोजना करून पाणी गळती थांबवली, त्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय टळला. त्याचबरोबर ग्रामपंचायतीने नदीपात्रात उघड्या पडलेल्या लोखंडी पाईपवर वाळूचा भराव टाकून भविष्यात पाणी गळती होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पळशी ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)
पाईपची गळती थांबवली
By admin | Updated: January 23, 2015 23:40 IST