सातारा : भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर सातार्यातील कार्यकर्ते भावूक झाले. अनेक ठिकाणी आपल्या लाडक्या नेत्याला श्रध्दांजली वाहणारे फलक लावण्यात आले. रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ आणि त्यांच्या सहकार्यांनी श्रध्दांजली वाहिली. किसन वीर कारखाना परिवाराच्यावतीनेही त्यांना आदरांजली वाहण्यात आली. दरम्यान, मुंडे यांच्या निधनानिमित्त सातारा येथे बुधवार, दि. ४ रोजी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्याबरोबरच सातारा बंदची हाक दिल्याची माहिती भारतीय जनता पार्टीच्या शहर शाखेतूून देण्यात आली. शहराध्यक्षा सुवर्णादेवी पाटील यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे भाजपचे फार मोठे नुकसान झाले आहे. ग्रामीण आणि शहरी राजकारणाची जाण असणारे सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची कामगिरी उत्कृष्ट होती. उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारे अनेक निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या निधनानिमित्त बुधवार, दि. ४ रोजी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन केले आहे. तसेच भाजपा आणि मित्रपक्षाच्यावतीने मुंडे यांना श्रध्दांजली म्हणून सातारा बंदचे आयोजन केल्याची माहितीही त्यांनी पत्रकात दिली आहे. ‘रिपाइं’च्या (आठवले गट)वतीने मुंडे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, मदन खंकाळ, रमेश विटकर, सागर सावंत, संतोष ओव्हाळ, किरण ओव्हाळ, योगेश माने, तात्या सोनावणे, मांतेश उपार आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या लोकनेत्याला सातारकरांची आदरांजली
By admin | Updated: June 4, 2014 00:15 IST