पाटण : पाटण विभागात मोबाईल नॉट रिचेबल दाखवत आहेत. विविध कंपन्यांच्या सिमकार्डला रेंज येत नसल्याने पर्यटक हताश झाले आहेत. अमर्याद संभाषण व इंटरनेट सेवा-सुविधा देणाऱ्या विविध कंपन्यांच्या सिमकार्डचा वापर सध्या जास्त प्रमाणात वाढला आहे. यातील काही कंपनीची सेवा पाटण विभागात सुरूही झालेली नसताना त्या कंपनीचे कार्ड लोकांनी खरेदीही केले आहेत. सध्या काही कंपनीच्या सिमकार्डला रेंज आहे. मात्र, नवीन सुरू झालेल्या नवीन कंपनीच्या सिमकार्डला रेंज नसल्याने संपर्क करण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
शामगाव विभागात मोकाट श्वानांचा उपद्रव
शामगाव : परिसरात मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला आहे. शामगाव, अंतवडी, रिसवड, करवडी आदी गावांत वीस ते तीस अशा मोठ्या संख्येने श्वान गावात व शिवारात फिरत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. तसेच रस्त्यावर अडथळे निर्माण होत आहेत. तसेच लहान- मोठे अपघातही होत आहेत. मोकाट श्वानांकडून पाळीव जनावरांवर हल्ला केला जात आहे. त्यामुळे जनावरे दगावण्याची भीती आहे. तसेच लहान मुलांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे श्वानांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
पाटण शहरात पोलीस गस्त वाढविण्याची गरज
रामापूर : पाटण शहरात गत काही दिवस सुरू असलेले घरफोडीचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. त्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी याबाबत ठोस उपाययोजना करण्याची आणि चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी होत आहे. शहरात चोरट्यांनी बंद घरे आणि बंद दुकानांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. गत काही दिवस शहरात बंद दुकाने, बंद घरे चोरट्यांंनी फोडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्याची गरज आहे. त्यासाठी रात्री पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
प्रत्येक कॉलनीत खड्ड्यांचे साम्राज्य
मलकापूर : आगाशिवनगरसह शहरात गटारालगत सांडपाणी वाहून जाण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, काम झाल्यानंतर चर बुजवण्याचे काम व्यवस्थित न केल्यामुळे प्रत्येक कॉलनीत प्रवेश करताना खड्ड्यानेच स्वागत होत आहे. तसेच केबलच्या कामासाठी उपमार्गावर खोदलेले व पावसाने पडलेले खड्डे धोकादायक बनले आहेत. जागोजागी खड्डे पडल्यामूळे नागरिकांसह वाहनचालक संताप व्यक्त करत आहेत.
ग्रामीण विभागात एसटी सुरू करण्याची मागणी
रामापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. सध्या कोरोनाची स्थिती आटोक्यात असल्यामुळे काही मार्गावर एसटी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. मात्र, ती पूर्ण क्षमतेने सुरू नाही. ग्रामीण भागात एसटी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील प्रवाशांतून होत आहे. पाटण ते कोयना, पाटण ते कुसरूंड, पाटण ते चाफोली, पाटण ते मणदुरे, पाटण ते सणबुर, पाटण ते ढेबेवाडी आदी मार्गावर एसटीच्या फेऱ्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
डोंगरपायथ्याच्या पिकांचे अतोनात नुकसान
रामापूर : पाटण तालुक्यातील डोंगरपायथ्याशी असलेल्या शेतीचे वन्यप्राण्यांकडून नुकसान केले जात आहे. रानडुक्कर, वानर, मोर, सायाळ आदी वन्यप्राण्यांकडून पिकांची नासधूस केली जात आहे. भातपिके काढून झाल्यानंतर त्यात रबी पिकाची पेरणी करण्याचे काम तालुक्यातील काही भागात सुरू आहे. मात्र, शेतात पेरणी केल्यानंतर मोर आणि रानडुकरांकडून नुकसान केले जात आहे. अगोदरच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची खरीप पिके वाया गेली. आता वन्यप्राणी नुकसान करीत असल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
अंतवडीत रस्ता खचल्यामुळे धोका
शामगाव : अंतवडी (ता. कराड) येथील अंतवडी ते मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाला जोडणारा रस्ता खचला आहे. त्यामुळे या मार्गावर धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यालगत विहीर आहे. त्याठिकाणी रस्ता खचला आहे. परिणामी येथे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. तसेच ठिकठिकाणी पावसाने रस्ता खचला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे धोक्याचे ठरत आहे. याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.