खटाव : महागाईच्या तडक्याने सर्वसामान्यांबरोबरच महिलावर्गाचे स्वयंपाक घरातील आर्थिक बजेट कोलमडू लागले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर ही महागाई अशीच राहिली तर दिवाळी साजरी करताना सर्वांनाच खिशाचा सल्ला घ्यावा लागणार आहे. सध्या ग्रामीण भागातही महागाईमुळे डाळींऐवजी ताटात पालेभाज्याच दिसू लागल्या आहे.एकीकडे डाळींच्या दराने उच्चांक गाठला आहे. तर दुसरीकडे रोजच्या जेवणात असणारा कांदा तसेच सर्वच भाज्यांचे दरही वाढले आहेत. त्यामुळे महिलावर्गाचे स्वयंपाक घरातील आर्थिक बजेट कोलमडत आहे. सर्वसामान्यांना आतापर्यंत भाज्यांचे दर वाढले तरी रोजच्या जेवणात डाळभाताचा तरी आधार होता; परंतु या डाळींच्या दरानेच आतापर्यंतचा उच्चांक गाठत द्विशतक पार केले आहे. त्यामुळे आता तर डाळीचे नाव न घेता बटाटा तसेच कडधान्यच बरी म्हणण्याची वेळ आली आहे.वाढत्या महागाईमुळे मात्र सर्वसामान्य जनतेबरोबरच मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील लोकांची मात्र यामुळे ओढाताण होताना दिसून येत आहे. तेलापासून सर्व धान्यांचे दर हे वधारलेलेच आहेत. त्यातच सर्वसामान्यांच्या रोजच्या जेवणात असणारे काही घटक आता या वाढत्या दरामुळे काहीकाळ का होईना बाजूला ठेवावे लागणारआहेत.अगोदरच दुष्काळाच्या झळा सोसत असणाऱ्या लोकांना महागाईमुळे अधिकच आर्थिक त्रास सोसावा लागत आहे. महिलावर्गाला विशेषत: स्वयंपाक घरात येणाऱ्या अडचणी सावरत असताना कुटुंबातील लोकांच्या आहाराचे नियोजन करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. तर वाढलेल्या डाळींच्या दारमुळे सध्यातरी प्रत्येकाच्या घरातून डाळ ही थोडीशी दुर्लक्षित केली जाऊ लागली आहे. (वार्ताहर) दर उतरणार की परिस्थिती जैसे थे राहणार?डाळींचे दर आवाक्यात असल्याने पूर्वी पालेभाज्यांना कमी मागणी होती. मात्र, डाळींचे दर कडाडताच स्वयंपाकघरातून डाळी हद्दपार झाल्या असून त्यांची जागा पालेभाज्यांनी घेतली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा सध्या पालेभाज्यांकडे कल वाढलेला दिसून येत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. डाळींचे दर कमी होणार की, ही परिस्थिती जैसे थे राहणार? याचीच चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे.डाळ, भात हा सर्वसामान्य लोकांचा, त्याचबरोबर लहान मुलांचा आवडीचा आहार आहे. परंतु याच डाळीचे दर कडाडल्यामुळे स्वयंपाक घरात नेहमी साठवून ठेवली जाणारी डाळ आता कमी दिसू लागली आहे. तर रोजच्या जेवणात नित्यनियमाने होणाऱ्या डाळींच्या वापरावर आम्हाला काहीसे बंधन आले आहे. डाळीचे दर कधी उतरतील याची आम्ही वाट पाहत आहोत. ऐंशी रुपयांवरून एकदम द्विशतक गाठलेल्या डाळीमुळे मात्र घरात आता कडधान्य तसेच फळभाज्याचा वापर करावा लागत आहे. - संध्या जोशी, गृहिणी
डाळींऐवजी पालेभाज्या ताटात
By admin | Updated: October 30, 2015 23:41 IST