सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कधी वाढताहेत तर कधी कमी होताहेत. दोन दिवसांपूर्वी दोनशेवर आलेला बाधितांचा आकडा आता चारशेवर गेला आहे. रविवारी आलेल्या अहवालामध्ये ४१० जण कोरोना बाधित आढळून आले असून, यामध्ये एकाचा बळी गेला आहे.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या घटू लागलीय, परंतु यामध्ये सातत्य नसल्याने आरोग्य विभाग थोडे चिंतेतच आहे. तरी सुद्धा सध्याची आकडेवारी प्रशासनाला दिलासा देणारीच आहे. रविवारी आलेल्या अहवालामध्ये तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे जावळी ८, कऱ्हाड ५७, खंडाळा ६, खटाव ५२, कोरेगाव २९, माण २६, महाबळेश्वर ३, पाटण ९, फलटण १०५ , सातारा ८९, वाई ७ व इतर १८ जणांचा बाधितांमध्ये समावेश आहे.
मृत्यू झालेल्यांमध्ये माण तालुक्यातील एकाचा समावेश आहे. दरम्यान, रविवारी दिवसभरात २५४ जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत २ लाख ४४ हजार ५०४ जण कोरोना बाधित आढळून आले असून, यामध्ये तब्बल ६ हजार १८ जणांचा कोरोनाने बळी घेतलाय. त्याचबरोबर कोरोना मुक्तीचेही प्रमाण चांगले असून, आत्तापर्यंत २ लाख ३२ हजार २२१ जण कोरोनावर यशस्वी मात करून घरी सुखरुप परतलेत.