सातारा : प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, महाविद्यालयीन शिक्षक यांना भरमसाठ पगार आहेत. त्यांना शासनाने एक ते दीड महिन्याची मे महिन्याची सुटी मंजूर केली आहे. शिक्षकांना मानसिक शांती व शारीरिक स्वास्थ मिळून कामासाठी त्यांना उत्साहक मिळावा हा त्यामागचा हेतू आहे. प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालये, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ही त्याचबरोबर सुट्ट्या मिळतात. ही मुले सुटी मिळाल्याने आनंदीत राहतात. सुटीच्या काळात मनमुराद आनंद लुटतात. चिंतामुक्त राहतात. खासगी शाळातील बालवाडीतील मुलेही सुटीवर असतात. आपणास सुटी मिळावी ही तीव्र इच्छा अंगणवाडीतील बालकांची असते. परंतु त्यांना अंगणवाडीत तीव्र उन्हाळ्यात डांबून ठेवले जाते. त्रस्त अंगणवाडी सेविका/मदतनीस यांनाही मानसिक आनंद व शारीरिक स्वास्थ मिळावे, अशी तीव्र इच्छा असते. परंतु शासन त्यांना सुटी देत नाही. १५ दिवस सेविका व १५ दिवस मदतनीस अशी सुटी दिली जाते. ती एक महिना मिळावी, अशी इच्छा आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तीव्र उन्हाळा पाण्याची गंभीर टंचाई आहे. अंगणवाडी इमारतीत सुविधा नाहीत. खेळण्यासाठी ओलावा व सावली असणारी मैदाने नाहीत. कसलाही मानसिक आनंद मिळेल, अशी सुविधा नाही. आहार शिजवण्यासाठी पाण्याची उपलब्धतता नाही. जिल्ह्यातील सेविका/मदतनीस यांनी शासनाने दिले नाही तरी सुटी घेणारच असा निर्धार केला आहे. त्यांनी संघटनेस तसेच शासनास तशी पत्रे देण्याची विनंती केली आहे. म्हणून संघटनेने महिला सुट्ट्या घेतील. सुटी संपलेनंतर प्रत्येक रविवार आहार देऊन आहाराचे दिवस भरून काढतील, अशी पत्रे शासनास दिली आहेत. जिल्ह्यातील हजारों पालकांनीही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना रजिस्टर पत्राने विद्यार्थ्यांना सुटी मंजूर करावी, अशी निवेदने दिली आहेत. सातारा जिल्ह्यातील ९० ते ९५ टक्के सेविका/मदतनीस यांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्रे देऊन २ मे ते ३१ मे २०१६ अखेर सुटीवर जात असल्याचे कळविले आहे. मानसिक शांती व शारीरिक स्वास्थ मिळणाऱ्या मानधनापेक्षा श्रेष्ठ आहे. अशी त्यांची भावना आहे. महाराष्ट्र शासनाने याउपरही महिलांना सुटी न दिल्यास व आर्थिक नुकसान केल्यास राज्य शासनाविरुद्ध योग्य ती न्यायालयीन कार्यवाही करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे, अशी माहिती संघटनेचे महासचिव शौकतभाई पठाण, राज्याध्यक्षा मंगल जेधे, जिल्हाध्यक्षा विमल चुनाडे, संघटनेच्या नेत्या संगीता बार्इंग, सुजाता रणनवरे, सरचिटणीस सुजाता बोबडे, आनंदी पवार, साधना चव्हाण, मंदा पाटील, तालुकाध्यक्षा खटाव अनिता जाधव, शोभा जाधव, अर्चना अहिरेकर, पुष्पा वेदपाठक, सुरेखा पवार, मालन जाधव, स्मिता जाधव, नीता सूर्यवंशी, अलका झेंडे आदींनी खास पत्रकाद्वारे दिले आहे. सेविका मदतनीस यांनी ३० एप्रिलपूर्वी सुटीचे अर्ज प्रकल्पांना सादर करावेत, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी) व्याजासह मानधन देण्याची मागणीबचतगटांनी प्रती लाभार्थी ४. ९२ रुपये शासन आहारासाठी देते. ते न परवडल्याने तसेच उन्हाचा त्रास होत असल्याने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी रितसर कारणे नमूद करून १ मे ते ३१ मे २०१५ या कालावधीत सुट्ट्या घेतल्या होत्या. सेविका मदतनीस यांना हक्काची सुटी १५ दिवस असते. त्या हक्काच्या सुटीचे मानधन कपात करताच येत नाही. याचा विचार करून जिल्ह्यातील काही बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रकल्पातील महिलांना १५ दिवसांचे हक्काचे मानधन दिले. परंतु सातारा, खटाव, फलटण तालुक्यांतील प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिले नाही. संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांनी १५ मे २०१६ पर्यंत ते अदा न केल्यास व्याज व दंड व १५ दिवसांचे मानधन मिळावे, यासाठी त्यांच्यावर कामगार कायद्यानुसार न्यायालयीन कार्यवाही करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे, अशी माहिती संघटनेचे महासचिव शौकतभाई पठाण यांनी दिली आहे. ४आहार प्रकल्पाने अंगणवाड्यांना देण्याची व्यवस्था केली असती तर महिला सुटीवर गेल्या नसत्या आणि म्हणून १५ दिवसांचे मानधन कापता येणार नाही, अशी संघटनेची भूमिका असून, महिन्याचे मानधन दंड व्याजासहित दिले जावे यासाठी सर्व संबंधितांविरुद्ध कार्यवाही दाखल केली जाणार आहे, असे संघटनेने ठरावात म्हटले आहे, अशी माहिती संघटनेच्या जिल्हाध्यक्षा विमल चुनाडे यांनी दिली आहे. ४रविवार, दि. १ मे रोजी काँग्रेसभवन एसटी स्टॅण्डनजीक सातारा येथे दुपारी १.३० वाजता यासंदर्भात जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून, या सभेस सर्व बिटप्रमुख, तालुकाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राज्याध्यक्षा मंगल जेधे व जिल्हाध्यक्षा विमल चुनाडे यांनी केले आहे.
पाण्याविना शिजेना पोषण आहाराची डाळ
By admin | Updated: April 29, 2016 00:30 IST