लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत कर्मचारीही बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील एक महिन्याच्या काळात जवळपास १०० कर्मचारी बाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचारी रुग्ण संख्या ८९२ झाली असून आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर ७८९ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या उत्तरार्धात आढळला. त्यानंतर विविध गावाबरोबरच शासकीय विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला. तर जिल्हा परिषदेत जुलै महिन्यात कोरोना पोहोचला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनेक विभागात कोरोनाचा शिरकाव झाला. आतापर्यंत अर्थ, रोजगार हमी योजना, बांधकाम, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, कृषी आदी विभागात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कर्मचारी आणि अधिकारीही कोरोना बाधित होत आहेत. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या एकूण ८९४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे मागील एक महिन्याच्या कालावधीत जवळपास १०० कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सातारा तालुक्यात कार्यरत १४० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कऱ्हाडमध्ये १११, कोरेगाव १३९, खटाव ८८, खंडाळा ३७, जावळी २७, पाटण ८४, फलटण ११२, महाबळेश्वर ३७, माण ५५ आणि वाई तालुक्यात कार्यरत असणाऱ्या ६४ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा १७ वर पोहोचला आहे.
कोरोना विषाणूमुळे खटाव तालुक्यात कार्यरत सर्वाधिक ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पाटण तालुक्यातील तिघांचा तर कोरेगाव, जावळी, फलटण आणि सातारा तालुक्यातील प्रत्येकी २ व माण तालुक्यात कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा कोरोनाने बळी गेला आहे.
चौकट :
८८ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू...
जिल्हा परिषदेच्या ८९४ कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. त्यामधील ७८९ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये कोरेगाव तालुक्यातील १३२ जणांचा समावेश आहे. तसेच सातारा तालुक्यातील १३६, पाटण ८१, कऱ्हाड ११०, महाबळेश्वर ३३, खटाव ६७, वाई ६०, फलटण ५६, खंडाळा ३७, जावळी २५ आणि माण तालुक्यात कार्यरत असणाऱ्या ५२ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ८८ कर्मचाऱ्यांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
....................................................