सातारा : गुढीपाडव्या दिवशी शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर अखेर महिलांना प्रवेश मिळाला. १९९८ पासू महाराष्ट्र अंनिसने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रश्न लावून धरला होता. त्याला यश मिळाले असून आता राज्यातील सर्वधमीय प्रार्थनास्थळांवर स्त्री-पुरुष समतेसाठी लढा उभारणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस प्रशांत पोतदार व राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी पत्रकाद्वारे दिली.पत्रकात म्हटले आहे की, डॉ. दाभोलकरांचे मारेकरी अजूनही मोकाट असले तरी त्यांचे विचार हे समाजात पुढे चालले आहेत. शनिशिंगणापूरचा महिला प्रवेश हा त्याची साक्ष देतो. स्त्रियांमध्ये आपल्या समान हक्कांविषयी जागृती निर्माण व्हावी, हीच शनिशिंगणापूरच्या लढाईची मूळ प्रेरणा होती. त्या पातळीवर डॉ. दाभोलकरांनी सुरू केलेला शनिशिंगणापूरचा लढा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळाराम मंदिर सत्याग्रह व साने गुरुजींच्या पंढरपूर सत्याग्रहाशी आपली नाळ सांगतो. शनिशिंगणापूरच्या समतेच्या लढाईत एक पाऊल पुढे पडले असले तरी देवाच्या आणि धर्माच्या नावावर महिलांचे होणारे शोषण थांबविण्यासाठी अंनिस सातत्याने कटिबद्ध राहील. केवळ हिंदू धर्मीय प्रार्थनास्थळे नव्हे तर सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवर स्त्री-पुरुष भेदभावासह कुठलाही भेदभाव केला जाऊ नये, यासाठी महाराष्ट्र अंनिस येत्या काळात कालबद्ध कृती कार्यक्रम हाती घेणार आहे. तसेच हाजी अली दर्ग्यातील महिलांना प्रवेशाची जनहित याचिका अजूनही प्रलंबित आहे व ही लढाई लढणाऱ्या महिलांच्या बरोबर अंनिस त्यांच्या हक्कासाठी लढाई देईल. (प्रतिनिधी)अहमदनगरमध्ये राज्यव्यापी परिषदपुढील रूपरेषा ठरविण्यासाठी दि. १ मे रोजी अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील व अध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथे राज्यव्यापी परिषद घेतली जाणार आहे. त्यामध्ये पुढील लढाईची ध्येयधोरणे जाहीर केली जाणार आहेत.
आता स्त्री-पुरुष समतेसाठी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवर लढा
By admin | Updated: April 12, 2016 00:45 IST