बावधन : अंगाचा थरकाप उडणाऱ्या माळीण येथील भीषण दुर्घटनेनंतर डोंगर पायथ्याला राहणाऱ्या नागरिकांचा व डोंगर घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांत घाटातून दरड कोसळू लागल्याने वाहनधारक व प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. पसरणी घाटातही गेले काही दिवसांत दोनदा दरड कोसळल्याचे प्रकार घडले आहेत. ही नैसर्गिक आपत्ती असली तरी त्यावर उपाययोजना करण्यास वाईची सार्वजनिक बांधकाम विभाग सपशेल अपशयी ठरल्याचे गुरुवारच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. सुरूर-पोलादपूर राज्य महामार्ग असलेल्या या रस्त्यावर वर्षभर वाहनाची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अवघड वळणे असलेल्या पसरणी घाटातून हा रस्ता जातो. घरात एका बाजूला डोंगर कडा तर दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या, अशा अवघड घाटातून प्रवास करणे म्हणजे वाहनधारकाची कसरत होते. सुमारे दहा किलोमीटर घाटात आवश्यक त्या उपाययोजना न झाल्याने यापूर्वी घाटात अनेक अपघात घडले आहेत. २००४ मध्ये तर खासगी बस दरीत कोसळून एकवीसजण ठार झाले होते. यानंतर बांधकाम विभागाने रस्त्यावर रिफ्लेक्टर व संरक्षक कठडे बांधले. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हणाव्या तितक्या उपाययोजना न झाल्याचे नंतर घडलेल्या अनेक अपघातावरून स्पष्ट झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यात पसरणी घाटात कुठे ना कुठे दरड कोसळण्याचे प्रकार घडत असतात; परंतु सुदैवाने यामध्ये कसलीही दुर्घटना नसल्याचे बांधकाम विभागाने याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरड कोसळल्यानंतर काही वेळातच या बाबतची कल्पना घाटात अडकलेल्या वाईतील प्रवाशांनी बांधकाम अधिकाऱ्याला दिले होते; परंतु हे कार्यालय साताऱ्यात आल्याचे सांगत माझी माणसे जेसीबी घेऊन घाटात लगेच पाठवतो, असे सांगताच सव्वातीन वाजले होते. यानंतर वारंवार प्रवासी व पोलिसांनी संपर्क साधून तत्काळ जेसीबी पाठविण्याची विनंती केली. काही वेळातच जेसीबी घटनास्थळी पोहोचला तोपर्यंत घाटात अडकून पडलेल्या पर्यटक व स्थानिक प्रवाशांनी संतप्त होत बांधकाम विभागाच्या कारभारावर अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली. अडकून पडलेली शाळकरी मुले अक्षरश: चार-पाच किमी पायी चालत आली. (प्रतिनिधी)बांधकाम विभागासाठी मोठा धडानैसर्गिक आपत्ती कधीही सांगून येत नसली तरी त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना मात्र शक्य तितक्या टाळणे संबंधित यंत्रणेच्या हातात असते. बांधकाम विभागने अगोदरच संभाव्य धोके लक्षात घेऊन खचलेले दगड बाजूला करण्याची आवश्यकता होती. शिवाय वाहतूक ठप्प होऊनही यासाठी घाटात पावसाळ्यात तरी एक जेसीबी सज्ज ठेवण्याची आवश्यकता होती. परंतु यापैकी काहीच काम विभागाचे दिसून आले. यापुढे तरी अधिकाऱ्यांनी घडलेल्या घटनेतून बोध घेऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ अधिकाऱ्यांना येऊ शकते.
कोसळणाऱ्या दरडीचं कोणालाच नाही दु:ख!
By admin | Updated: August 1, 2014 23:22 IST