वाठारस्टेशन : ‘ज्या देशात नैसर्गिक साधन संपत्तीचा अभाव असतो, तेथे बौद्धिक संपदा देशाच्या विकासासाठी महत्त्वाची असते, अशी बौद्धिक संपदा ही निर्माण करण्यासाठी संस्कृती कलेल्या विकासातून वाढीस लागते. सोळशीसारख्या डोंगरकपारीच्या भागात भरणारी अशी राज्यस्तरीय साहित्य संमेलने संस्कृती टिकविण्यासाठी गरजेची आहेत,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. सोळशी, ता. कोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले हे होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, शनैश्वर देवस्थानचे मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज, धारेश्वर महाराज, आ. आनंदराव पाटील, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, मराठी विश्व सािहत्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे, संमेलन स्वागताध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, राजूशेठ लोढा, माजी आमदार सतीश देशमुख, छत्रपती संभाजी पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ शिंदे यांच्याकडे संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द करण्यात आली व ‘वसनातीर’ या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. चव्हाण म्हणाले, ‘साहित्यात राजकारणी आले की काही मुद्दे उपस्थित होतात; मात्र ग्रामीण भागात होणारे हे साहित्यसंमेलन त्याला अपवाद आहे. तसे पाहता देशाचा विकास भौतिक मोजमापावर होतो; मात्र समाजाचा विकास तिथल्या सांस्कृतिक मापदंडावर आधारित असतो. त्यामुळे संस्कृती टिकवणे गरजेचे आहे. साहित्यात मराठी, इंग्रजी असा भाषिक वाद नेहमीच होत असतो. इंग्रजीला विरोध अनेक वर्षांपासून आहे. आम्ही शाळेत असताना इंग्रजीविरोधी धोरण शासनाने राबविले व आठवीनंतर इंग्रजी विषय सुरू केला त्याचा फटका माझ्यासह तीन पिढ्यांना बसला. त्यामुळे आज केंद्रात असलेल्या १५० सचिवांमध्ये एकही मराठी अधिकारी दिसत नाहीत. त्यामुळे संस्कृती टिकविण्यासाठी मराठी बरोबरच ज्ञानगंगा म्हणून इंग्रजी आवश्यक आहे.’ संमेलनाचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे म्हणाले, ‘मी साहित्यिक म्हणून घडण्यात गावसंस्कृतीने शब्द व साहित्य दिले. तेथील माणसं वाचली, निसर्ग जवळून पाहिला यातून साहित्यिक म्हणून घडलो. साहित्य वैभव निर्माण करायचे असेल तर युवकांनी, मुलांनी लिहितं झालं पाहिजे. शेतकऱ्यांच्या वेदना, दुष्काळाच्या झळा शब्दातून मांडल्या पाहिजेत. शासनाने यासाठी अशी साहित्य संमेलने गावोगावी भरवावीत.’ अशा संमेलनांना २५ लाखांचा निधी द्यावा. तर गाव तिथे वाचनालये सुरू करावीत. नाटक हा साहित्याच अविभाज्य भाग आहे. गावागावात नाट्यमंडळं निर्माण झाली पाहिजेत. यासाठी १५ लाख अनुदान देण्यात यावे.’ कार्यक्रमाचे अध्यक्ष मदन भोसले, मठाधिपती नंदगिरी महाराज, स्वागताध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. शनैश्वर सेवेकरी मंडळाचे अध्यक्ष डॉ. अशोक कदम यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)
संस्कृतीसाठी साहित्य संमेलनाची गरज : चव्हाण
By admin | Updated: November 29, 2015 00:50 IST