लोकमत न्यूज नेटवर्क
वरकुटे-मलवडी : पानवन (ता. माण) येथील समन्वयाच्या अभावामुळे गत पंचवार्षिकला ग्रामपंचायतीची गेलेली सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत महालक्ष्मी पॅनेलने यावेळेस पुन्हा खेचून आणली. अकरापैकी सात उमेदवार निवडून आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत महालक्ष्मी ग्रामविकास पॅनेलच्या जयश्री नानासो शिंदे यांची सरपंचपदी तर चांगुणा रायचंद शिंदे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.
निवडणुकीपूर्वी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर न झाल्यामुळे ही निवडणूक मोठ्या अटीतटीने लढली गेली. माजी चेअरमन धनाजी शिंदे, माजी सरपंच दत्तात्रय शिंदे, डॉ. नानासाहेब शिंदे, संभाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व संदिपान तोरणे, पोपट शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने पानवन ग्रामपंचायतीमध्ये ७-४ असे घवघवीत यश मिळवले.
निवडीवेळी जयश्री शिंदे व चांगुणा शिंदे यांचे दोनच अर्ज आल्याने आणि विरोधी गटातील सदस्य अनुपस्थित राहिल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. यावेळी सत्ताधारी गटाचे माधुरी विकास तोरणे, धनाजी श्रीमंत शिंदे, राजू भीमा तुपे, गोविंदा वसंत शिंदे, विजया हनमंत नरळे हे सदस्य उपस्थित होते.
नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार, रामराजे नाईक-निंबाळकर, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, डॉ. संदीप पोळ आदी मान्यवरांनी कौतुक केले.