राष्ट्रवादी मेळावा : कोंडीत सापडलेल्या बाळासाहेबांचे शेजारच्या मतदारसंघावरच अधिक लक्षकऱ्हाड : घोरपडेंचे ‘वार’ अन कदमांचा ‘डंका’ यामुळे उत्तरेतील आमदारांचं साम्राज्य कोंडीत सापडलंय म्हणे ! म्हणूनच काय आमदार आता पुणे, मुंबईतही मेळावे घेऊ लागले आहेत. तरीही उद्या बुधवारी दक्षिणेत राष्ट्रवादीचा मेळावा घेण्यास आमदारांच्या ‘घड्याळात’ वेळ सापडला आहे. हा वेळ ‘आवळा देऊन कोहळा’ काढण्यासाठी असेल, पण त्यांचा हा उपाय म्हणजे ‘आग रामेश्वरी अन बंब सोमेश्वरी’ असाच असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कऱ्हाड दक्षिणेतील संभाव्य उमेदवारीमुळे हा मतदारसंघ ‘हॉट’ बनला आहे़ काँग्रेसचे विद्यमान आमदार विलासराव पाटील-उंडाळकर व अतुल भोसलेंच्या बंडखोर भूमिकेमुळे वातावरण तप्त झाले आहे़ त्यातच बाळासाहेबांनी दक्षिणेतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा घेतलेला हा मेळावा नेमका कशासाठी याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. कऱ्हाड दक्षिण हा तर काँग्रेसचा बालेकिल्ला. आमदार विलासराव पाटील-उंडाळकर येथे आठव्यांदा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत़ खरं तर दक्षिणेत राष्ट्रवादी उभी करण्याचे काम दिवंगत विलासराव पाटील-वाठारकर यांनी ‘इमाने इतबारे’ केले़ थोरल्या पवारांंच्या सुचनेवरून त्यांनी तिनदा उंडाळकरांविरोधात दंड थोपटले खरे; पण त्याची परतफेड ‘नाफेड’ वगळता श्रेष्ठींनी विशेष काही केल्याचे माहितीत नाही़ गेल्या विधानसभा निवडणूकीवेळी मतदारसंघ पुनर्रचनेत कऱ्हाड दक्षिणेत कऱ्हाड, मलकापूर शहरासह उत्तरेतील १५ गावांचा समावेश झाला आणि मतदार संघाचे चित्र बदलले़ पुन्हा वाठारकरांनीच उंडाळकरांविरोधात दंड थोपटले़ पाहुणे असणारे उत्तरचे आमदार मदतीला धावतील, अशी आशा त्यांना होती़; पण आमदारांचे एक बंधू शेवटच्या कार्यक्रमात वाठारकरांच्या व्यासपीठावर दिसले एवढेच !उत्तरेत ४२ हजारांचे मताधिक्य घेतल्यानंतर बाळासाहेबांनी दक्षिणेत तिसरा पर्याय देण्याचे संकेत देत स्वारीची तयारी चालवली. बंधू जयंत पाटील यांच्या हातात ते दक्षिणचा झेंडा देतील अशी अटकळ बांधली जात होती, मात्र सुभाष पाटील यांच नाव पुढे कसे काय आले, हाही संशोेधनाचाच भाग बनला आहे़ पण सध्या तरी दक्षिणेवर स्वारी करून राजकीय ‘धक्का’ देण्याइतपत ताकद राष्ट्रवादीकडे दिसत नाही़ तरीही बाळासाहेबांची ही उठाठेव कशासाठी हे लवकरच समजेल. (प्रतिनिधी)वाठारकर गट अस्वस्थ !दक्षिणेतील राष्ट्रवादीचे जनक दिवंगत विलासराव पाटील - वाठारकर होत. पण बुधवारचा राष्ट्रवादीचा मेळावा घेणाऱ्यांना त्यांचा विसर पडल्याचे तालुक्यात झळकणाऱ्या फ्लेक्सवरून दिसते. तर त्यांचे वारसदार जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील यांनाही संयोजकांनी बरोबर घेतल्याचे जाणवत नाही. दक्षिणमध्ये वाठारकर गटाला वजा करून चाललेल्या याप्रकारामुळे त्यांच्या समर्थकांमध्यवे अस्वस्थता पसरली आहे.
राष्ट्रवादी मेळावा : कोंडीत सापडलेल्या बाळासाहेबांचे शेजारच्या मतदारसंघावरच अधिक लक्ष
By admin | Updated: August 26, 2014 21:51 IST