खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीची घोषणा झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्याच निवडणुकीसाठी प्रमुख पक्ष अतिशय दक्ष झाले आहेत. सध्या खंडाळा शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. या ज्वलंत प्रश्नाचीही राजकीय पटलावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने खंडाळा नगरपंचायतीच्या पणतीत पाण्याचं तेल ओतले जात आहे. सध्या सोशल मीडियावर यावर शाब्दिक खडाजंगी जोरकस सुरू असल्याने निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरणात रंग भरू लागले आहेत. खंडाळा नगरपंचायतीची घोषणा २७ मे रोजी झाल्यानंतर येथे प्रशासकीय कारभार सुरू झाला. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची समस्या भलतीच गंभीर बनली आहे. त्यामुळे आठवड्यातून तीन-चारच वेळा पाणी नागरिकांना मिळत आहे. ते सुद्धा कमी दाबाने आणि अल्पवेळच पुरवले जात आहे. त्यामुळे नागरिकांची ससेहोलपट सुरू आहे. याबाबत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, योग्य व्यवस्था करावी, अशा मागणीचे निवेदन नुकतेच पायउतार झालेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना दिले आहे. निवेदनाचे फोटोही सोशल मीडियावर झळकू लागले; हाच धागा पकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या प्रसिद्धीचा खरपूस समाचार घेत सोशल मीडियावर आतषबाजी सुरू केली आहे. ज्यांनी सत्ता भोगली त्यांनीच निवेदन दिले तर मग इतकी वर्षे काय काम केले, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळे सध्या खंडाळ्यातील राजकीय वातावरणात वणवा भडकला आहे. मात्र, त्यासाठी तेल म्हणून पाण्याचा वापर केला गेलाय आणि शाब्दिक चकमकीची वात पेटवून राजकीय रंग भरले जात आहेत. खंडाळ्यातील तरुणांच्या व्हॉट्सअॅप ग्रुप तसेच फेसबुकवर सध्या हीच चर्चा चवीने चघळली जात आहे. विरोधकांनी पाण्याच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षालाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रत्युत्तर करण्यासाठी व्यूहरचना केली जात आहे. येथील राजकीय घडामोडी नेहमीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या भोवती फिरत आहेत. त्यातच नगरपंचायतीसाठी शिवसेना आणि भाजपनेही आपला मोर्चा वळविला आहे. खंडाळ्यातील प्रत्येक घटनेवर एकमेकांचे बारकाव्याने लक्ष लागून राहिले आहे. आतापासूनच अंदाजित प्रभाग लक्षात घेऊन आपापल्या पक्षाच्या मुद्द्यांची पेरणी करण्याचे काम सुरू आहे. त्यातच पिण्याच्या पाण्यावरून राजकारण पेटू लागल्याने शाब्दिक चकमकी घडून येत आहेत. सोशल मीडियावर वापर यासाठी प्रभावी ठरत आहे. एकीकडे पाण्यासाठी उठाठेव तर दुसरीकडे जनता हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. त्यामुळे पाण्याचे ग्रहण कधी संपणार याचीच प्रतीक्षा नागरिकांना आहे. (प्रतिनिधी) सत्ता असताना काय काम ? खंडाळ्यात पाण्याच्या पुरवठ्यासाठी प्रशासकांना ज्यांनी सत्ता भोगली त्यांनीच निवेदन दिले. मग १५ वर्षे सत्ता असताना त्यांनी काय केले. पाण्याची समस्या का मिटली नाही. केवळ जनतेबद्दल आस्था असल्याचे निवडणुकीच्या तोंडावर दाखवण्याचा हा प्रकार आहे. १५ दिवसांत प्रशासकाकडे मागणी करणाऱ्यांनी १५ वर्षांत पाणी योजनेविषयी केलेल्या कामांची जनतेलाच उत्तरे द्यावीत. त्यांच्या विचारांची कीव करावी वाटते. - शैलेश गाढवे टँकर सुरु करा खंडाळ्यातील टंचाईवर मात करून अतिरिक्त पाणी उपलब्ध करून ते विहिरीत सोडून शहराला सुरळीत पाणी पुरवावे. सर्वत्रच पाणीटंचाई असल्याने खंडाळ्यातही टँकर सुरू करावा, या मागणीसाठी आम्ही निवेदन दिले होते. - प्रकाश गाढवे,
नगरपंचायतीच्या पणतीत पाण्याचं तेल !
By admin | Updated: June 21, 2016 01:20 IST