लोकमत न्यूज नेटवर्क
आदर्की : फलटण पश्चिम भागात मान्सून व मान्सून पूर्व पावसाने दडी मारल्याने रब्बी हंगाम वाया जाणार असल्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत असून, चार गावांच्या पाणीपुरवठा योजना व शेकडो एकर बागायती क्षेत्र मुळीकवाडी धरणावर अवलंबून असते; पण धरणच पंधरा दिवसांत कोरडे पडणार असल्याने पाणीप्रश्न बिकट बनणार आहे. त्यामुळे धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून मुळीकवाडी धरणात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
फलटण पश्चिम भागातील दुष्काळी भागात मुळीकवाडी गावच्या हद्दीत १९७१ मध्ये दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करून पूर्ण करण्यात आले. त्यामध्ये पाणीसाठा होऊन पोटपाटाने नांदल व मुळीकवाडी गावचे क्षेत्र ओलिताखाली आले, तर घाडगेवाडी, सासवड येथील शेतकऱ्यांनी धरणातील पाणी पाईपलाईनद्वारे उचलून शेती बागायती करण्याचा प्रयत्न केला आहे.
दुष्काळी भागाच्या पिण्याच्या पाण्यासाठी सहा ते सात कोटी खर्च करून सासवड प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाकडे व चाचणी घेत असतानाच असफल ठरली. त्यामुळे समाविष्ठ गावातील मुळीकवाडी, घाडगेवाडी, सासवड, नांदल या गावांनी मुळीकवाडी धरणात व धरणाखाली सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहीर खोदून गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवून पाणी टंचाईवर मात केली आहे.
गत पाच-सहा वर्षे धोम-बलकवडीचे पाणी धरणात सोडत असल्याने गावे टँकरमुक्त व टंचाईमुक्त झाली. याबरोबर बागायती क्षेत्र वाढून ऊस, फळबाग, कांदा, टॉमेटो आदी नगदी पिकाच्या लागवडीत वाढ झाली. यावर्षी जून महिन्यापासून रिमझिम पडत आहे. धरण क्षेत्रात व डोंगरावर मोठा पाऊस झाला नाही, त्यामुळे धरणात पाणीसाठा झाला नाही. बाष्पिभवन व पाणी उपशामुळे पाण्याने तळ गाठला आहे.
धोम-बलकवडी कालव्यात एक महिना झाले पाण्याचे आवर्तन सोडले आहे. संबंधित गावांनी पाणी सोडण्यासाठी गावचे ठराव पाठवले आहेत तरी पाणी सोडले नाही. येत्या पंधरा दिवसांत पाऊस व धोम-बलकवडी कालव्याचे पाणी न सोडल्यास पाणी प्रश्न बिकट होणार आहे, तरी धरणात पाणी सोडण्याची मागणी होत आहे.
कोट..
पाणी मागणी ठराव दहा दिवसांपूर्वी संबंधित विभागाकडे पाठवला आहे. पाणीपट्टी शेतकऱ्याकडून गोळा करून भरणार आहे मुळीकवाडी धरणात पाणीसाठा अल्प प्रमाणात आहे.
-गणेश कदम, उपसरपंच, मुळीकवाडी, ता . फलटण
२२आदर्की
मुळीकवाडी ता. फलटण येथील धरणात अल्पसाठा उपलब्ध आहे.