वडूज : ‘संथारा’ (सल्लेखना) या जैन धर्मातील पवित्र व्रताचा आत्महत्येशी संबंध जोडून, या व्रतावर निर्बंध लादण्याच्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाने तमाम जैन समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहे. न्यायालयाने या बाबीचा पुर्नविचार करावा, या मागणीसाठी मंगळवारी वडूज येथे जैन समाज बांधवांनी मूकमोर्चा काढला.याबाबत तहसीलदार विवेक साळुंखे यांना निवेदन देणयात आले. निवेदनात म्हटले आहे की, सल्लेखना हे जैन धर्मातील अत्यंत महत्वपूर्ण व्रत असून नुकतेच राजस्थान उच्च न्यायालयाने हे व्रत बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला आहे. जैन तत्वज्ञानातील संल्लेखना म्हणजे आपले जीवनाचे इतिकर्तव्य संपल्यानंतर अत्यंत शांतपणे, संयमपूर्वक, सर्वांची क्षमा मागून तपश्चरणाच्या जोरावर क्रमश: आहार, पाणी कमी करून आपल्या देहावरील ममत्व सोडून देऊन देहाचाही त्याग करणे होय. यामुळे हे व्रत अत्यंत श्रेष्ठ असून हे बेकायदेशीर ठरविल्यामुळे जैन समाज बांधवांच्या भावना दुखविल्या गेल्या आहेत. उच्च न्यायालयाचा हा निर्णय दुर्दैवी व जैन तत्वाच्या व रूढींच्या विरूध्द आहे.मोर्चात बाजार समितीचे संचालक गिरीषशेठ शहा, विकल्पशेठ शहा, अॅड. अभयकुमार मेहता, राजू शहा, हर्षवर्धन शहा,किशोर व्होरा,सुहास शहा, मिलींद व्होरा, प्रमोद दोशी, अभय दोशी, राहूल व्होरा, संतोष शहा, गजूभाई दोशी, पदमराज गांधी, धनूभाई गांधी, पंकज मेहता, वैभव गांधी आदींसह जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनीधी)
‘संथारा’साठी वडूजला मूकमोर्चा
By admin | Updated: August 25, 2015 23:06 IST