खंडाळा : ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य असू शकतं आणि आपण ते निर्माण करू शकतो हे स्वप्न नुसतं दाखवलं नाही तर ते प्रत्यक्षात उतरवलं. मान, सन्मान, अभिमान हरवलेल्या सामान्य माणसांना सोबत घेऊन बहुजनांचे राज्य स्थापन केले. संकटं अनेक होती, पण त्या सगळ्यावर मात करत शिवाजी महाराज छत्रपती झाले. कठीण काळात परिस्थितीवर मात कशी करावी, हे शिवचरित्राच्या अभ्यासातून कळते,’ असे मत नगराध्यक्ष प्रल्हाद खंडागळे यांनी व्यक्त केले.
खंडाळा नगरपंचायतीच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा नगरपंचायतसमोर ध्वज फडकवून साजरा करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या वेळी नगरसेवक अनिरुद्ध गाढवे, साजिद मुल्ला, दत्तात्रय गाढवे, विनोद गाढवे, अजय सोळसकर, शेखर खंडागळे, संतोष देशमुख उपस्थित होते.
राज्य शासनाने छत्रपती शिवराय मनामनांत ही संकल्पना वास्तवात उतरविण्यासाठी गावोगावी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे खंडाळा नगरपंचायतीत हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वज फडकविण्यासह छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.