प्रमोद सुकरे, कऱ्हाड :गेले महिनाभर मुख्यमंत्री बदलाच्या सुरु असणाऱ्या चर्चेला आता पुन्हा गती आली आहे.‘पृथ्वीराज’ संपवून ‘सुशिल नेतृत्व’ आणण्याची तयारी काहीजण करीत असल्याचे मानले जात आहे. पण या चर्चेने पृथ्वीराज चव्हाण समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आपली अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी काहींनी ‘सोशल मिडीया’चा आधार घेतला असून ‘नेतृत्व नव्हे..मनं बदला,’ अशा आशयाच्या पोस्ट सर्वत्र फिरु लागल्या आहेत.देशात लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला अपयशाचा ‘जोर का झटका’ बसला आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी या पराभवाची नैतिक जबाबदारी यापूर्वीच स्विकारली आहे. परंतु काही राज्यात नजीकच्या काळात विधानसभा होऊ घातल्या आहेत. त्यात महाराष्ट्र आहे. ‘त्या निवडणुकीला सामोरे जाताना राज्याच्या नेतृत्वाचा चेहरा बदलावा का?’ अशी चर्चा कॉंग्रेस वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे ‘पृथ्वीराज’ संपवून ‘सुशिल नेतृत्व’ आणण्याची तयारी काहीजण करीत असल्याचे मानले जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री बदलाचा सर्वच राजकीय पक्षांचा इतिहास पाहिला तर त्यात त्यांना यश आल्याचे दिसत नाही. तरीही राजकारणात काय घडेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण समर्थकांना चिंता वाटणं स्वाभाविक आहे. आपली मतं व्यक्त करण्यासाठी त्यांनी सोशल मिडियाचा वापर सुरु केला असून ‘मुख्यमंत्री बदलला तर निर्माण होईल असंतोष. नेतृत्व नव्हे..मनं बदला. सह्याद्रिच्या सुपुत्राची होतेय घुसमट !’ अशा आशयाच्या पोस्ट सध्या मोबाईलवर फिरु लागल्या आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मात्र पक्ष नेतृत्व देईल ती जबाबदारी सांभाळणार, अशी सावध भूमिका मांडत आहेत. त्यामुळे साऱ्यांचे लक्ष सोनियांच्या निर्णयाकडे लागून राहिले आहे. मुख्यमंत्री समर्थक दिल्लीतमुख्यमंत्री बदलण्यासाठी दिल्लीत कॉंग्रेसमधीलच काही दिग्गजांनी दिल्लीत आघाडी उघडली असताना पश्चिम महाराष्ट्रातील पृथ्वीराज चव्हाण समर्थकही दिल्लीत पोहचले आहेत. यात काही मंत्री व आमदारांचा समावेश आहे. मुख्यमंत्री बदलाच्या सुरू असलेल्या चर्चेबाबत कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना प्रतिक्रिया विचारल्या असता ‘अगोदर निर्णय तर घेऊ द्यात; मगच आमच्या प्रतिक्रिया देऊ,’असे त्यांनी सांगितले. मग राष्ट्रवादीही बदलणार का ?लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जसे अपयश आले. त्याबरोबर राष्ट्रवादीलाही अपयश आलेच आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्व बदलाबाबत चर्चा सुरू आहे. तर प्रदेशाध्यक्ष बदलाच्याही हालचाली आहेत. राष्ट्रवादीला अपयश आले असेल तर त्यांचाही अध्यक्ष म्हणून बदलणार का, असा सवाल करत एका काँग्रेस कार्यकर्त्याने ‘ही वेळ भांडत बसण्याची नाही तर एकदिलाने काम करण्याची आहे,’ असे नाव न छापण्याच्या अटीवर सांगीतले. पतंगराव म्हणाले, ‘सुधीनं वागू या’गत आठवड्यात मंत्री पतंगराव कदम यांनी सांगली येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ‘आपण सारे जण सुधीनं वागूया. निवडणुकीला तीन चार महिने उरलेत. नेतृत्व बदलून काहीच साध्य होणार नाही. त्यापेक्षा आपापसात भांडण्यापेक्षा केलेली विकासकामे जनतेपर्यंत घेउन जाऊ या,’ असे सूचक वक्तव्य केले होते. पण पतंगरावांचं म्हणणं कोणी सिरीयस घेतलं नाही म्हणे.घुसमट नवी नाही दिवंगत यशवंतराव चव्हाणांच्यापासून पाहिले तर दिल्लीत महाराष्ट्राची नेहमीच घुसमट होत आली आहे. तशीच घुसमट सह्याद्रिच्या सुपुत्राची करण्याचा प्रयत्न कॉंग्रेसमधील काही मातब्बर करीत असल्याची चर्चा मुख्यमंत्री समर्थकांच्यात सुरु आहे. ही घुसमट मराठी माणसाला नवी नाही, असेही म्हटले जात आहे.
मोबाईलवर झळकतेय सह्याद्रिच्या सुपुत्राची घुसमट
By admin | Updated: June 22, 2014 00:19 IST